तारापुरातील वाढते नागरीकरण चिंतेस कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:12 IST2025-06-09T12:06:24+5:302025-06-09T12:12:17+5:30

Tarapur News: तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून ५ किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा नागरीकरण सुरू आहे. त्याबाबत संबंधित सरकारी यंत्रणांचे कोणतेही निश्चित असे धोरण नसल्याचे दिसते. बेकायदा उभ्या राहणाऱ्या या बांधकामावर कोणाचेही नियंत्रण नाही.

Growing urbanization in Tarapur is a cause for concern... | तारापुरातील वाढते नागरीकरण चिंतेस कारण...

तारापुरातील वाढते नागरीकरण चिंतेस कारण...

- हितेन नाईक
(पालघर समन्वयक)
तारापूर अणुऊर्जा केंद्रापासून ५ किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा नागरीकरण सुरू आहे. त्याबाबत संबंधित सरकारी यंत्रणांचे कोणतेही निश्चित असे धोरण नसल्याचे दिसते. बेकायदा उभ्या राहणाऱ्या या बांधकामावर कोणाचेही नियंत्रण नाही. अणुऊर्जा प्रकल्पात किरणोत्सर्गासारखी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास हाहाकार उडण्याची भीती आहे.

अणुऊर्जा केंद्रात दुर्घटना घडून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी सराव चाचण्या केल्या जातात. त्यातून लोकांचे प्रबोधन केले जाते. मात्र, एकाच वेळी शेकडो, हजारो किंवा लाखो लोक दुर्घटनेत अडकले, तर प्रकल्प यंत्रणा वा जिल्हा आपत्ती प्राधिकरण यांच्याकडे ठोस नियोजन असल्याचा विश्वास अणुऊर्जा प्रकल्प व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अद्याप देऊ शकलेले नाही. सरावादरम्यान मोजक्याच लोकांना त्या परिसरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविताना या साऱ्या यंत्रणांची उडणारी तारांबळ लक्षात घेता, ५ किलोमीटर परिसरातील रहिवाशांना एकाच वेळी बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेताना त्यांची काय भंबेरी उडू शकते, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे.

अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तारापूर अणुऊर्जा केंद्रात १७ जानेवारी २०२० रोजी वायु विसर्जनाच्या चिमणीत स्फोट झाल्याने पहिल्या टप्प्यातील वीज निर्मिती काही काळासाठी बंद केली होती. हायड्रोजन वायूचा स्फोट झाल्याची माहिती पुढे आल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. एकात्मिक अणुपुनर्प्रक्रिया केंद्र (आयएनआरपी)मध्ये अधूनमधून घडणारे अपघात, आत्महत्या आदींमुळे सर्वसामान्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे.

अणुऊर्जा प्रकल्पात वायू गळती अथवा एखादी किरणोत्सर्गाची दुर्घटना घडल्यास सुमारे २० किलोमीटर क्षेत्रातील लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी कुठलीही ठोस व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही. मॉकड्रिलसारख्या कागदावर तयार करण्यात येणाऱ्या योजनेत अनेक उणिवा असल्याचे निदर्शनास 
आले होते. 
तारापूर, घिवली, पाचमार्ग, कुडन उच्छळी, दांडी आदी परिसरातील सुमारे १० ते १५ लाख लोकसंख्येला एकाच वेळी बाहेर काढण्याचे ठोस नियोजन यंत्रणांकडे तयार असल्याचे दिसत नाही. दुसरीकडे, एवढ्या मोठ्या लोकसंख्येने लोकांना, वाहनांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी मोठे रस्ते, पूल आदी पायाभूत सुविधाच उभारल्या नसल्याचे दिसते.
‘बीएआरसी’च्या गेटसमोर १.६ किमी परिसरात परप्रांतीयांची वसाहत आहे. दुकाने थाटलेली आहेत. तारापूर बायपास रस्त्यावर ५ किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्रात तिवरांची कत्तल करून तेथे बेकायदा वसाहती उभ्या राहिल्या आहेत, राहत आहेत. या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटरच्या प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या अनेक गावांत राहणारे भाडेकरू, कामगार यांच्या कागदपत्रांची छाननी, पडताळणी करण्याची गरज आहे. हा भाग संवेदनशील असल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी तातडीने हे करणे आवश्यक आहे. अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या आसपास काही बांगलादेशीय राहत असल्याचा स्थानिकांना संशय आहे. त्यादृष्टीनेही तपास करणे क्रमप्राप्त आहे.

Web Title: Growing urbanization in Tarapur is a cause for concern...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर