Coronavirus : समाधानकारक बाब, पालघर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:34 AM2020-03-18T00:34:36+5:302020-03-18T00:37:35+5:30

मुंबईत दुबईवरून आलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेल्या नानाविध उपाययोजनाचे चांगले निकाल दिसून येत आहेत.

Coronavirus: Satisfactory, there is no corona Patient in Palghar district | Coronavirus : समाधानकारक बाब, पालघर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही

Coronavirus : समाधानकारक बाब, पालघर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित नाही

Next

पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनासदृश्य लक्षणे आढळलेल्या १४ रुग्णांच्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातील तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याने जिल्ह्यासाठी ही बाब समाधानकारक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत दुबईवरून आलेल्या एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जवळच असलेल्या पालघर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेल्या नानाविध उपाययोजनाचे चांगले निकाल दिसून येत आहेत. कालपर्यंत ९ लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांचे निकाल निगेटिव्ह आल्यानंतर उर्वरित ६ लोकांचे निकालही निगेटिव्ह आल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सध्या तिसºया व चौथ्या फेरीच्या दृष्टिकोनाने जिल्हाधिकाऱ्यांनी धार्मिक नेते, व्यापारी तसेच पोलीस अधिकारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कोेरोना विषाणूचा संसर्ग किती वेगाने पसरतो याविषयी माहिती देतानाच धार्मिक कार्यक्र म आपल्या जिल्ह्यात आयोजित करू नये. लोक जमावाने जमतील अशी प्रार्थना पूजाअर्चा करू नये. सर्वांनी आपल्या घरात वैयक्तिक पूजा-अर्चा करावी, असे जिल्हाधिकारी त्यांना सांगितले. जिल्हाधिकाºयांच्या विनंतीला सर्व धर्मगुरुंनी धार्मिक नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यापारी वर्गाला त्यांच्या दुकानात जास्त लोकांचा जमाव जमू नये यासाठी आपली दुकाने पुढील काही दिवस बंद ठेवण्याची विनंतीही व्यापारी वर्गाने मान्य केली आहे.

पालघर जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना
पालघर जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात पालघरचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) डॉ.किरण महाजन यांची कक्ष प्रमख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तर पांडुरंग मगदूम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), टी.ओ. चव्हाण, उपमुख्य कार्यकारी, (ग्रा.पं.) जिल्हा परिषद, पालघर, योगेश पाटील, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग, पालघर यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
पालघरचे अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर यांची सदस्य सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. हे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या पालघर जिल्हा नियंत्रण कक्षात उपस्थित राहून तालुका स्तरावरील कोरोना विषाणू (कोव्हिड १९) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका स्तरावर करण्यात येणाºया कार्यवाहीचे समन्वय साधून सनियंत्रण करणार आहेत.

प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रा रद्द करण्याचा निर्णय
कासा : डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या प्रसारामुळे अखेर खबरदारी म्हणून रद्द करण्यात आली असून शासकीय आदेशानुसार ३१ मार्चपर्यंत दर्शन व्यवस्था भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे.डहाणू प्रांताधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दुपारी ३ वाजता महालक्ष्मी मंदिर कार्यालयात शासकीय यंत्रणा व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या उपस्थितीत यात्रासंदर्भात तातडीची सभा आयोजित करण्यात आली. या वेळी डहाणू तहसीलदार राहुल सारंग, कासा सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे, महालक्ष्मी ट्रस्ट अध्यक्ष संतोष देशमुख, कोषाध्यक्ष वसंत सातवी, कार्यवाह शशिकांत ठाकूर, डहाणू गटविकास अधिकारी भरक्षे, सरपंच पूजा सातवी, पंचायत समिती सदस्य सुभाष चौरे, मधू सातवी आदी उपस्थित होते. लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या डहाणूची प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा दरवर्षी चैत्र पौर्णिमेपासून सुरू होत असून १५ दिवस चालणाºया या यात्रेत जिल्ह्यातील भाविकाबरोबर मुंबई, ठाणे व गुजरात राज्यातील लाखो भाविक येतात. पंधरा दिवस चालणाºया या यात्रेत मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची दुकाने, करमणूक खेळ, खाद्य पदार्थ, पाळणे आदी हजारो दुकाने थाटली जातात. सदर यात्रा ८ एप्रिलपासून सुरू होणार होती, मात्र कोरोनाच्या प्रसारामुळे राज्यात शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर केली असून पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, सामाजिक कार्यक्रम आदीवर बंदी आणली असून जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश काढला आहे. त्या अनुषंगाने कोरोनाबाबत खबरदारी म्हणून ३१ मार्चपर्यंत मंदिरातील दर्शन बंद केले आहे.

शासननिर्णय व जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदी आदेश ३१ मार्चपर्यंत असले तरी सध्याची परिस्थिती व यात्रा नियोजन करणे लक्षात घेता ८ एप्रिल रोजी होणारी यात्रा होणे शक्य नाही. त्यामुळे ती रद्द करण्यात येत आहे.
- सौरभ कटियार, प्रांताधिकारी, डहाणू

कोरोनाचा प्रसार लक्षात घेता प्रांताधिकारी यांनी आयोजित केलेल्या सभेत पुढील खबरदारी म्हणून चैत्र पौर्णिमाला सुरू होणार देवीचा यात्रा उत्सव रद्द करण्यात आला आहे.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, श्री महालक्ष्मी ट्रस्ट

मनाई आदेशभंग : गुन्हा दाखल
नालासोपारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हाधिकाºयांनी मनाई आदेश काढला आहे. या आदेशाचा भंग केला म्हणून वालीव पोलीस ठाण्यात तीन हॉटेलविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलमअंतर्गत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी
डॉ. कैलास शिंदे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मनाई आदेश काढला आहे. तरीही मुंबई-अहमदाबाद महामार्गावर हॉटेल सुरू ठेवली होती.े

जिल्हाधिका-यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्यामुळे महामार्गावरील सनाया ढाबाचे मॅनेजर मुस्तफा इस्माई चारोलिया (४०), अलिफ ढाबाचे मॅनेजर मोसीन मकबूल गाढिया (३०) आणि भिवंडी ढाबाचे मॅनेजर सलीम खुर्शीद खान (३०) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कोरोना सर्वत्र पसरू नये म्हणून हॉटेलचालकांनी स्वत:हून हॉटेल बंद ठेवले पाहिजे, जेणेकरून जास्त लोक जेवणासाठी जमणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून तीन हॉटेलच्या मॅनेजरवर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केले आहेत.
-विलास चौगुले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वालीव पोलीस ठाणे


रेल्वेत हरिनामाचा गजर बंद
पारोळ : कोरोना व्हायरसने जगात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना त्याचे रुग्ण मुंबईमध्ये सापडले असल्याने मुंबईची लाईफ लाईन असलेल्या रेल्वेतील चर्चगेट ते विरार व इतर रेल्वे मार्गावरील १६३ भजन मंडळांनी रोज गाडीत होणारी भजने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या पश्चिम रेल्वेत १६३ भजन मंडळे महासंघासोबत जोडली आहेत.

रोज सकाळी ती भजन मंडळे प्रवाशांची सकाळ सुखद करत असतात. रेल्वे हे गर्दीचे ठिकाण असल्याने व कोरोना व्हायरसचे रुग्ण समोर आल्याने या भजन मंडळांच्या महासंघाने या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय सभेत घेतला. त्यांनी २९ मार्चला नालासोपारा येथे घेण्यात येणारा तपपूर्ती सोहळाही रद्द केला असल्याचे भजन मंडळ महासंघाचे वसंत प्रभू यांनी सांगितले.

जीवदानी मंदिर बंद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून विरार येथील प्रसिद्ध जीवदानी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंदिर व्यवस्थापनाने मंदिर बंदचा बोर्ड लावला आहे. जीवदानी मंदिरामध्ये मुंबईसह अनेक भागांतून असंख्य लोक दर्शनासाठी येत असतात.

बोहाडा सण तत्काळ बंद करण्याचे आदेश
पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मनाई आदेशाला झुगारून मोखाडा येथे हजारो लोकांच्या जमावाने बोहाडा सणाचे आयोजन केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना हा बोहाडा तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले.
पालघर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावरून करण्यात येणाºया कार्यवाहीचे सनियंत्रण व त्याचे समन्वय साधण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू (कोव्हिड १९) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका स्तरावरून करण्यात येणाºया कार्यवाहीचे सनियंत्रण व त्याचे समन्वय साधण्यासाठी अधिकाºयांचा जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

संशयितांवर नजर; पथकांची नियुक्ती
वसई विरार उपप्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसला तरी वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी संशयितांवर नजर ठेवण्याचे काम महापालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. त्यासाठी खास २१ पथके तैनात करण्यात आली आहेत.

पोलीस ठाण्यात मास्कशिवाय नो एन्ट्री
वसई विरार शहरातील पोलीस ठाण्यांत मास्कशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यात मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पोलीस ठाण्यात येणाºया प्रत्येकाला मास्क लावून प्रवेश करा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात फलकदेखील लावण्यात आले आहे.

महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेसची स्वच्छता
कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन बसेसची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता करण्यात आली आहे. या बसेस निर्जंतुक करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच कोरोनाच्या दहशतीमुळे सध्या रस्त्यांवर, बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत दिसून येतो. राज्यात कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता नागरिक लोकल, बसने प्रवास करायला घाबरू लागले आहेत. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगली आहे.

Web Title: Coronavirus: Satisfactory, there is no corona Patient in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.