मालखान्यातून दारू चोरणारे दारूविक्रेत्यांकडे कामावर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST2020-04-17T05:00:00+5:302020-04-17T05:00:44+5:30
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. आरती चौक परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मालखाना आहे. या मालखान्यात जप्तीतील दारू साठवणूक करून ठेवली जाते.

मालखान्यातून दारू चोरणारे दारूविक्रेत्यांकडे कामावर ?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील आरती चौक परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालखान्यातून दारू चोरी करताना चौघांना अटक केली होती. त्या प्रकरणात शहर पोलिसांनी पुन्हा चार महिलांना अटक केली असून आरोपींची संख्या आता आठवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे चोरी प्रकरणातील आरोपी हे रामनगर परिसरातील दारूविक्रेत्यांकडे कामावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांनी तर त्यांना मालखान्यातून दारूची चोरी करावयास सांगितले नसेल ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील अवैध दारूविक्रेत्यांच्या अडचणी वाढल्या आहे. दारूविक्रेत्यांकडे नागरिकांना देण्यासाठी दारूच नसल्याने दारूविक्रेते नवनवीन शक्कल लढवत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. आरती चौक परिसरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मालखाना आहे. या मालखान्यात जप्तीतील दारू साठवणूक करून ठेवली जाते. ११ रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मालखान्यातील दारू चोरली होती. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश फुलहार, मनोज उईके, सुनील वनकर, रविकांत ठाकूर यांना अटक केली होती. याचा तपास सुरू असतानाच शहर पोलिसांना आर्वीनाका परिसरातील झोपडपट्टीतील काही महिलांचा या चोरी प्रकरणात सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सोनू मुळे, पूजा मुळे, अनिता जाधव, शांता सातपुते यांना अटक केली. शहरात सुमारे दोनशेच्यावर दारूविक्रेते दारूविक्रीचा व्यवसाय करीत असून लॉकडाऊनमुळे दारूची चोरटी वाहतूकही बंद झाली आहे. आता मद्यपींना देण्यासाठी दारूविक्रेत्यांकडे दारूच उपलब्ध नसल्याने त्यांनी थेट मालखान्यात ठेवलेली जप्तीतील दारू चोरी करण्याची शक्कल लढविली तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी यादृष्टीनेही तपासचक्र फिरविण्याची गरज आहे.
दारू चोरी प्रकरणामागे मोठी साखळी असून चोरट्यांनी चोरलेली दारू कोणाला पुरविली, या चोरीमागे कोणाचे कनेक्शन आहे. याचा सखोल तपास सुरु आहे. चोरीतील कनेक्शन असलेल्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल.
योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, वर्धा शहर