रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने मिळाली महिलेची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2015 02:31 IST2015-06-29T02:31:50+5:302015-06-29T02:31:50+5:30
अकोला येथून वर्धेला येण्याकरिता रेल्वेत बसलेल्या महिलेची बॅग गाडीतच राहिली. याची माहिती तिने वर्धा रेल्वे पोलिसांना दिली.

रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने मिळाली महिलेची बॅग
४४ हजारांचा ऐवज सुखरुप : अकोल्याच्या महिलेला बॅग केली परत
वर्धा: अकोला येथून वर्धेला येण्याकरिता रेल्वेत बसलेल्या महिलेची बॅग गाडीतच राहिली. याची माहिती तिने वर्धा रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच गाडीत असलेल्या पोलिसाला माहिती देत सदर बॅग नागपूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतली. ही बॅग दुसऱ्या रेल्वे गाडीने पाठवून वर्धा रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली.
पोलिसांजवळ आलेली बॅग तपासून ती तक्रारकर्ती महिला तारा सारंगधर खंडारे (५५) रा. अकोला यांच्या स्वाधीन करण्यात आली. ताराबाईने बॅग तपासणी केली असता, बॅगमधील सर्वच साहित्य सुखरूप असल्याचे निदर्शनास आले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रानुसार, अकोला येथील तारा खंडारे या पती व मुलीसोबत वर्धेला येण्याकरिता गीतांजली एक्स्प्रेसमध्ये बसल्या. त्यांच्याकडे सामान्य वर्गाचे तिकीट असताना त्या आरक्षित डब्यात चढल्या. वर्धा रेल्वे स्थानक येताच लगबगीने उतरल्या. यात त्यांची बॅग गाडीतच राहिल्याचे लक्षात आले. तोपर्यंत गीतांजली एक्स्प्रेस वर्धेवरून रवाना झाली होती. त्यांनी तात्काळ रेल्वे पोलीस स्थानक गाठत प्रकाराचा माहिती दिली. यावेळी कार्यरत असलेले कर्मचारी उमेश चनेकार व जमादार गोटेफोडे यांनी लगेच गाडीत असलेले पोलीस कर्मचारी रावत यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करुन माहिती दिली. रावत यांनी मिळालेल्या सूचनेनुसार व बॅगेच्या वर्णनानुसार चौकशी करून बॅग ताब्यात घेतली.(प्रतिनिधी)