आभाळ रूसलं म्हणून आपण रूसायचं नसतं
By Admin | Updated: October 24, 2015 02:11 IST2015-10-24T02:11:23+5:302015-10-24T02:11:23+5:30
आभाळ रूसलं म्हणून आपण आपल्या माणसांवर रूसायचं का, आपण त्यांना का मदत करू नये.

आभाळ रूसलं म्हणून आपण रूसायचं नसतं
नाना पाटेकर : ‘नाम’कडून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत
वर्धा : आभाळ रूसलं म्हणून आपण आपल्या माणसांवर रूसायचं का, आपण त्यांना का मदत करू नये. आपल्या माणसांची आपणच मदत करायची असते. नाम ही आमची दोघांची मिरासदारी नाही. आपणही याशी जुळलो पाहिजे. शेती करणारी, कर्जापायी आत्महत्या करणारी व त्यांच्या कुटुंबातील ही मंडळी आपल्याला घरची वाटत नाही, ही शोकांतिका व्यक्त करतानाच ही मंडळी जोपर्यंत आपल्याला घरची वाटणार नाही, तोपर्यंत समस्या संपणार नाही, असे नाना पाटेकर म्हणाले.
मुंबई, पुण्यात आपल्याला दिसत नसली तरी गावांत, गरीब घरांतील माणुसकी अजून टिकून आहे. गावांत निवांतपणा आहे. माझ्याकडे जमीन नसेल; पण माझ्या सातबाऱ्यावर असलेली माणसे मोठी आहे. मरेपर्यंत हे काम मी चालू ठेवेल. हे नाटक नाही, हा समारंभ नाही तरी इतकी माणसे का येतात. नाना, मकरंदला बघायला! पाहायला येऊ नका, नामशी जुळायला या, असे सांगतच नाना म्हणाले, पैसा कपाटात ठेवून मोजण्यात अर्थ नाही. तो उपयोगी आला पाहिजे. माझी इस्टेट ही सरणावर लागणारी लाकड, सहा बाय तीनची जमीन आहे. मी शेतकरी भोगत असलेल्या विवंचनेतून गेलो आहे. यामुळे अपमान, अवहेलना मला माहिती आहे. गरीबीमध्ये नातलग कमी असतात. सधन झाल्यावर नातलग जवळ असतात; पण ते आपले नसतात. यामुळे ते असूच नये, असे भावनिक मतही नाना पाटेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.(कार्यालय प्रतिनिधी)
माझ्या एवढ्या मुली विधवा का व्हाव्या
मला विचार येतोय, माझ्या एवढ्या मुली विधवा का झाल्या. मी एकटा यांना पूरणार आहे काय, बाप म्हणून! माझे कुटुंब दिवसेंदिवस वाढत आहे. यांना आम्ही दोघे पूरणार नाही. सर्वांनी पुढे आले पाहिजे. माणूस असाल तर नाममध्ये या, असे आवाहनही नाना पाटेकर यांनी केले. आपण सर्व ही चळवळ मोठी करू. एकेक गाव घेऊ. माझ्या मुली, भगिनींना पाण्यासाठी दूरवर जावे लागू नये. यासाठी गावे टँकरमुक्त करू. तुमचीही साथ हवी आहे. आपण स्वत:च्या जंजाळातून बाहेर पडत नाही. मी बाहेर पडलो. प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांची विवंचना संपविण्याचा हा एक प्रयत्न आहे. तो आपण सर्वांनी करायचा आहे. सर्व पक्ष बाजूला सारून ते करू, असे मार्मिक भावही नानाने व्यक्त केले.
महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर
‘नाम’ फाऊंडेशनच्यावतीने अमरावती, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना सानुग्रह मदत देण्यात आली. एका साध्या सत्यासाठी असे नाव असलेल्या कार्यक्रमाला ४७५ महिला उपस्थित होत्या. दु:खी, कष्टी भाव चेहऱ्यावर उमटलेल्या या महिलांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करण्यासाठी मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर यांनी मार्गदर्शन केले. नामची मदत व नाना, मकरंद यांच्या सांत्वनेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर उमटली होती.
उघडा पडेल सारा संसार हा अशाने...
‘शेतकरी आत्महत्या’ हे भयानक वास्तव आहे. एका साध्या सत्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांच्या डोळ्यात हे वास्तव झळकत होते. यामुळे संपूर्ण सभागृहच धीरगंभीर झाले होते. ‘उघडा पडेल सारा संसार हा अशाने, सुटणार नाही प्रश्न गळफास घेतल्याने’, या कवितेच्या ओळींनी शेतकरी कुटुंबातील महिलांसह सर्वांनाच या जळजळीत वास्तवाचा परिचय करून दिला.
घरी १४ एकर शेती असतानाही नापिकीमुळे ह्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या जाण्यानंतर खूप कर्ज झाले; पण नातेवाईकांनी दिलेल्या आधारामुळे हळूहळू कर्ज फेडणं सुरू आहे. या काळात शासनाची एकही मदत माझ्यापर्यंत पोहोचली नाही. माझ्याही मनात जीवन संपविण्याचा विचार डोकावत होता; पण मुलांकडे पाहून हा विचार मनातून काढून टाकला. आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी पर्याय नाही, हे कळून चुकले. मागच्या पाच वर्षांपासून माझा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, ही इच्छा असून त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.
- अर्चना सरडे, रा. इंझाळा, ता. देवळी, जि. वर्धा.
चार वर्षांपासून दिवाळीचा दिवा लागला नाही. २००६ मध्ये माझ्या घरच्या धन्याने बँकेच्या कर्जापायी आत्महत्या केली. तेव्हापासून कर्ज खंडवित आणले. आता ३० हजार बाकी आहे. यावर्षी नापिकी झाल्याने यंदा तरी कर्ज फिटन, असे वाटत होते. मागच्या नऊ वर्षांपासून सोयचं बसत नाही, तरीही मेहनत करून शेतात आता विहीर बांधली. यामुळे थोडासा आधार आहे. शासनाच्या योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि माहिती विचारण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. फक्त हिंमत आहे, ती मेहनत करण्याची आणि अस्मानी संकटाला तोंड देण्याची!
- प्रेमिला सावरकर, दहेगाव, जि. यवतमाळ.
लग्नाला तीन वर्ष झाले असतानाच ह्यांनी कर्जापायी आत्महत्या केली. एक मुलगी आहे आणि आता तिच जगण्याचा आधार आहे. शिक्षण घेतले तरी मला आता नोकरी मिळेल, याची आशा नाही. पाच वर्षांत शेतीमुळे घरात सुबत्ता आली, असा अनुभव अजून आलाच नाही; पण शेती करण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शेतीतच स्वत:ला झोकून देत शेतात राबायचं, मुलीला चांगलं शिक्षण देऊन स्वावलंबी करायचं, हीच इच्छा आहे. हिंमत न हारता काम करायचं आणि लोकं काय म्हणतात, याकडे डोळेझाक करायची, हेच ठरवलं आहे. हा संघर्ष कायमच राहणार आहे.
- सुवर्णा डायरे, रा. मारेगाव, जि. यवतमाळ.
शेतीत पैसा लावला; पण त्यातून उत्पन्न मिळेलच, याची आशा नसते. यंदाचं साल तर खूपच भयावह आहे. यामुळे दोन वेळचे जेवण तरी मिळेल काय? हा प्रश्न सतावत आहे. शेतीचा सर्व्हे झाला नाही. घरात कोणी आजारी पडलं तर त्याच्यावर उपचार कसा करावा इथपासून समस्या आहे. या समस्यांचा सामना करताना शरीर थकले असले तरी मन सुदृढ आहे. भविष्याची चिंता न करता शेतात राबायचं, हेच ठरवलं आहे.
- प्रतिभा वैद्य, रा. इंझाळा, ता. देवळी, जि. वर्धा.
घरी बारा एकर शेती असताना ओल्या आणि कोरड्या दुष्काळात सर्व बर्बाद झाले. मुलांना शाळेत टाकायची सोय राहिली नाही. त्यासाठी कर्ज घेऊन शिक्षण सुरू आहे. नापिकी आणि कर्ज यामुळे ह्यांनी आत्महत्या केली. तरी मी मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. जमेल तेवढे शेत वाहतीखाली घेऊन दोन वेळच्या जेवनाची सोय करीत आहे. मनात कधीही आत्महत्येचा विचार येऊ दिला नाही. मुलांसाठी मेहनत करून जगणार आहे.
- मीरा मलकापुरे, रा. घाटंजी, जि. यवतमाळ.
सात एकर कोरडवाहू शेती आहे. त्यावरच कर्जाचा डोंबर वाढला आहे. यामुळे आता मक्त्याने शेती करून आलेल्या पैशावर दोन वेळच्या जेवणाचा बंदोबस्त करणे सुरू आहे. दोन मुलींची लग्न करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. नापिकी आणि कर्ज यामुळे शेतकऱ्याचं जीणं कठीण झालं आहे. शासन घोषणा करीत आहे, शेतकऱ्याला भरघोस दिलं, असं सांगत आहे; पण ते आम्हाला कधी भेटलचं नाही, अशी परिस्थिती आहे. याचा विचार झालाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता, हिंमत न हारता काम केलं तर त्याचं फळ मिळतचं असते. मला मुलींसाठी जगायचेच आहे.
- प्रभा आत्राम, रा. देवळी जि. वर्धा.
संक्रांतीच्या दिवशी आत्महत्या केल्याची वार्ता कानावर धडकली. त्यानंतर सगळे कुटुंब हादरले. मुलींचे लग्न, सततची नापिकी यामुळे कर्जाचा डोंगर अधिकच वाढला. हा ताण सहन न झाल्याने त्यांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली. शेतमजुरी करून जगणे, हाच एक पर्याय माझ्यापुढे शिल्लक राहिला आहे. तीन एकर कोरडवाहू शेती आहे; पण शेती करण्यासाठी हातात पैसा नाही. ‘हातावर आणणे आणि पानावर खाणे’, असा जीवनक्रम सध्या सुरू आहे. कधी-कधी उपाशीही राहावं लागतं; पण कोणापुढे हात पसरायचा नाही, असे ठरविले आहे. त्यामुळे कष्ट उपसण्याची मनाची तयारी केली आहे. नातेवाईकही रूसले आहेत. यामुळे मुलींसाठी आता स्वत: मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही.
- अरुणा कापसे, रा. दहेगाव, ता. घाटंजी, जि. यवतमाळ.