सात दिवसांपासून तणावात होते गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:44+5:30
आरोपी व पीडिता यांच्या दोघांच्याही घराजवळ पोलिसांचा मोठा लवाजमा राहात होता. दररोज रात्री गावात तरूण व नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत होते. मात्र या गावाने आपला संयम ढळू दिला नाही. अखेर सोमवारी १० तारेखाला दुखाची बातमी आली.

सात दिवसांपासून तणावात होते गाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट येथे गेल्या सोमवारी पीडित युवतीला पेट्रोल टाकून जाळून टाकण्यात आले. या घटनेपासून हिंगणघाट तालुक्यातील पीडिता व आरोपी यांचे गाव तणावाखाली जगत होते. गावच्या लेकीवर हा कसा प्रसंग कोसळला याची चिंता गावातील वयोवृध्दांसह बाया, माणसं सर्वांनाच होती. घटनेनंतर गावात पोलिसांचा वावर वाढला होता.
आरोपी व पीडिता यांच्या दोघांच्याही घराजवळ पोलिसांचा मोठा लवाजमा राहात होता. दररोज रात्री गावात तरूण व नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून या घटनेचा निषेध करीत होते. मात्र या गावाने आपला संयम ढळू दिला नाही. अखेर सोमवारी १० तारेखाला दुखाची बातमी आली. गावाची लेक आपल्याला सोडून गेली, हे कळल्यावर गावकऱ्यांचा संयम सुटला. शेकडोच्या संख्येने लोकं त्या गावाकडे जावू लागले. त्यामुळे या गावाकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरून गेले होते.
गावात शव येणार याची कल्पना देण्यासाठी सकाळी ७ वाजताच पोलिसांच्या गाड्या धडकल्या. पोलिसांनी गावातील प्रमुख लोकांना विश्वास घेत गावातील शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरीस दुपारी १ वाजून ५ मिनीटांनी पीडित मुलीचे शव रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या रुग्णवाहिकेवरच दगडफेक सुरू केली. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यातून आणून दुपारनंतर अंत्यसंस्कार होईपर्यंत गावाचा संयम कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पीडितेचा भाऊ बाहेरगावी असल्याने तो येईपर्यंत मृतदेह ठेवावा लागला. त्याला घेण्यासाठी वर्धा रेल्वे स्थानकावर अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित होता. त्याला घरी पोहचवताच पार्थिव मोक्षधामाच्या मार्गाने मार्गस्थ झाले. येथे प्रशासनाकडून लेखी हमी लिहून घेण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. आठ दिवसापासून तणावात असलेल्या या गावात मुलीच्या मृत्यूने अनेकजण हळहळून गेले होते. गावातील उच्च शिक्षीत मुलगी गेली, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.