मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्यायच
By Admin | Updated: June 18, 2016 01:35 IST2016-06-18T01:35:26+5:302016-06-18T01:35:26+5:30
या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे.

मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांवर अन्यायच
हिंगणघाट : या कार्यक्रमात पुढे बोलताना खा. पटेल म्हणाले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवित सत्ता मिळविलेल्या मोदी शासनाच्या दोन वर्षांच्या काळात कृषक समाजावर प्रचंड अन्याय होत आहे. सद्यस्थितीत व्यापारी, उद्योजक, शेतकऱ्यांपासून सर्वच दुखी असून हेच काय ते अच्छे दिन म्हणून जनता पश्चाताप करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दोन वर्षांत केंद्र व राज्य शासनाने केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही. जुन्या महत्त्वपूर्ण योजना बंद करणे व काहीचे नावात फेरबदल करून पुन्हा त्याच राबविणे या शिवाय दुसरे काहीच केले नसल्याचे ते म्हणाले. शेती संबंधी कवडीचे ही ज्ञान नसल्याकडून शेती संबंधी निर्णय घेण्यात येत असल्याने शेतकरी संकटात सापडल्याचा आरोप पटेल यांनी केला. तालुका स्तरावरील ही बाजार समिती शासन योजनांपलीकडे जावून शेतकऱ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबविते ही बाब भुषणावह असल्याचे सांगून सभापती अॅड कोठारी व संचालक मंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.
प्रास्ताविक करताना बाजार समितीचे सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी २००० साली ७० कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीची उलाढाल १४०० कोटीवर पोहचल्याचे सांगितले. यंदाच्या १२ कोटीच्या उत्पनातून खर्च वजा जाता शुद्ध नफा ६ कोटी असल्याचे ते म्हणाले. गत १५ वर्षांत शेतकऱ्यांना विकासाचा केंद्र बिंदु मानत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या एक रुपयात भरपोट जेवण, एक रुपयात निवास व चहापाण्याची सोय, स्मशानभूमी तेथे विहीर, बसस्थानका पर्यंत मोफत बस सेवा, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर लॅपटाप, व्यावसायिक शिक्षणासाठी ५० टक्के अनुदान, पांदण व सिंचन योजनेसाठी अनुदान , शौचालयासाठी आर्थिक मदत शाळा व आंगणवाडींना पख्यांचे वाटप, कृषीवर आधारित चर्चासत्र आदी संबंधी कार्याची त्यांनी विस्तृत माहिती दिली. यावेळी मंचावर उपस्थितीत अतिथींनी अॅड. कोठारी यांच्या कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीत बैल मृत्यूमुखी तसेच घर जळालेल्या शेतकऱ्यांना मान्यवरांचे हस्ते आर्थिक मदत तसेच अंगणवाडीला विजेचे पंखे वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश डालीया यांनी केले तर आभार उपसभापती वडतकर यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)