परिवहन महामंडळाच्या लालपरीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:47 IST2019-01-05T21:46:49+5:302019-01-05T21:47:38+5:30
प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक सुकर झालेले आहे.

परिवहन महामंडळाच्या लालपरीची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : प्रवाशांच्या विश्वासातील आणि हक्काचे प्रवासी साधन म्हणजे राज्य परिवन महामंडळाची बस. पण सध्या या लालपरीची दुरवस्था झाल्याचे दिसून येते.
परिवहन महामंडळाने ग्रामीण क्षेत्रासह शहरी भागात चांगली सुविधा प्रदान केल्याने प्रवासी आणि नागरिकांना कामे करणे अधिक सुकर झालेले आहे. बसच्या माध्यमातून विद्यार्थी आणि नागरिक सहज ये-जा करीत असून वेळ व पैशाची बचत होऊ लागली. विद्यार्थी आणि वयोवृद्धांना याचा अधिक लाभ घेता येऊ लागला आहे. ग्रामीण भागात भंगार बसेस धावताना दिसून येतात, अशी ओरड होऊ लागली आहे आणि ते सत्य असल्याचे दिसून येते. शुक्रवारी वर्धा हमदापूर वर्धा एमएच ४० एन ८७१९ ही बस हमदापूरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास आली. प्रवासी मोजकेच होते. बसच्या खिडक्यांना सुरक्षिततेच्या गज नव्हते. मागील आसनांचे कुशन खाली पडले होते.
प्रवासात अनेक लहान बालके असतात. त्यांना खिडकीजवळ बसायला आवडते. यासाठी ते हट्ट धरतात. खिडकीबाहेर हात, डोके बाहेर काढून पाहणे त्यांना आवडते. पण, हे जीवावर बेतणारे ठरू शकते.
ग्रामीण भागात भंगार बसेस धावतात, ही ओरड प्रवाशांची असली तरी ग्रामीण क्षेत्रातील दुर्दशित रस्ते आणि महामंडळ प्रशासन याला जबाबदार आहे. सेवाग्राम-खरांगणा गोडे या मार्गादरम्यान प्रवास करणे म्हणजे अनेक दुखण्यांना आमंत्रण देणे होय. प्रवाशांंना बसताना सतर्कता बाळगावी लागते.
राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांचे हित सदैव जोपासने आवश्यक असून चांगल्या बसेस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून देणे आवश्यकच असून जनतेचा तो अधिकार आहे. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.