अवकाळीचा ४ हजार ७६८ हेक्टरला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST2020-03-20T06:00:00+5:302020-03-20T06:00:18+5:30
अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळीचा ४ हजार ७६८ हेक्टरला फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रबी हंगामातील पिके मळणीच्या टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने शेतशिवार झोडपून काढल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला. मंगळवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याच्या २९३ गावातील ४ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनास सादर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यामध्ये मंळवारच्या रात्री मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. काही परिसरात गारपीटही झाली. यामुळे वर्धा, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी, कारंजा, हिंगणघाट व समुद्रपूर या आठही तालुक्यात कमीअधिक प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागला. या अवकाळी पावसाने कपशीसह गहू, तूर, चणा, कांदा व भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले असून संत्रा व केळीच्या बागाही उद्धवस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका आर्वी तालुक्याला बसला असून या तालुक्यातील १७२ गावे बाधित झाल्याने ३ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
आठही तालुक्यातील २९३ बाधित गावातील ६८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. यात वर्धा तालुक्यातील सर्वाधिक ३० घरांची नोंद आहे. आर्वी तालुक्यात १४, देवळीत १३, हिंगणघाटात सात तर सेलू तीन घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे आर्वी आणि आष्टी तालुक्यातील प्रत्येकी एका गोठ्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
दोघे जखमी, जनावरेही दगावली
वादळी पावसासह कारंजा तालुक्यात वीज पडल्यामुळे सावल येथे एक तर खैरवाडा येथे तीन असे चार शेतकरी जखमी झाले आहे. एकावर कारंजा तर तिघांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रशासनाकडे केवळ दोन व्यक्तींची माहिती आल्याने प्राथमिक अहवालात दोन व्यक्तींचाच समावेश करण्यात आला आहे. तसेच सेलू व आष्टी तालुक्यात प्रत्येकी एक जनावर दगावले आहे.