तीन महिन्यांतच खांब धाराशाही
By Admin | Updated: June 27, 2015 02:45 IST2015-06-27T02:45:53+5:302015-06-27T02:45:53+5:30
प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, ...

तीन महिन्यांतच खांब धाराशाही
देवळी : प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना पावसाळ्याआधी विद्युत जोडणी द्या, अन्यथा कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. कंत्राटदारांनीही कारवाईच्या भीतीपोटी वीजजोडणीचे काम हाती घेवून काही भागात ते पूर्णत्वास नेले. पण पहिल्याच पावसात विद्युत खांबांनी जमिनीवर लोळण घेतली आहे. तर काही तारांच्या जोरावर लोंबकळत आहे. तीन महिन्यांच्या कालावधीतच हे खांब पडल्याने ऐन हंगामात देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील शेतकऱ्यांची पेरणी आणि मशागतीची काम खोळंबली आहे.
शेकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सिंचनाची आवश्यकता असल्याने शासनाच्या जलपूर्ती आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दहा शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरी देण्यात आल्या. या सिंचन विहिरीवरील कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र्र राज्य विद्युत वितरणकडे तक्रारीही दिल्याचे सांगितले. तक्रारीनंतर वायगाव(नि.) येथील शाखा अभियंता यांनी वीजपुरवठा बंद केला. परंतु खांब उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचण येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खांब पूर्ववत उभे करावे, अशी मागणी सोनेगाव येथील शेतकरी करीत आहे. तसेच आडवे पडलेले तारही मशागतीत अडथळे निर्माण करीत असल्याने ते लवकर हटवावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.(प्रतिनिधी)
कामाची चौकशी करून कारवाईची मागणी
कृषी पंपांना विद्युत पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे रूद्राणी नामक कंपनीला वीज खांब उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यानुसार रूद्राणी नामक कंपनीने शेतात खांब उभे करण्याचे काम केले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लगबगीने विद्युत खांब जमिनीत रोवण्यात आले. कंत्राटदारांनी सोनेगाव (बाई) येथील दहाही विहिरीवर वीजपुरवठा करण्यासाठी सिमेंट खांब टाकून विद्युत प्रवाह सुरू केला.
आता आपल्या शेतातील विहिरीवरून शेतात ओलित करून पाऊस नसला तरी पिके जगवता येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण पहिल्या पावसातच अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीतच या विहिरीचे खांब जमिनीवर कोसळले.काही ताराचा आधार असल्याने लोंबकळत आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी वायगाव निपाणी येथील शाखा अभियंत्यांना दिली. त्यांनी गावात जावून या खांबांचा पुरवठा बंद केला पण खांब उचलण्यासाठी पाऊले उचलली नाही. शेतात पडून असलेल्या या खांबामुळे शेतकऱ्यांना मशागत करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही रखडलेल्या आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे खांब पूर्वस्थितीत आणावे किंवा खांबांना जोडलेले तार काढून मशागतीसाठी शेत मोकळे करून द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहे. काही शेतकऱ्यांनी याबबात महावितरणकडे तक्रारीही दिल्याचे सांगितले.
वीज वितरण कंपनीने केले हात वर
जवळपास वीस पोल जमिनीवर पडले आणि काही लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांनी याची माहिती वायगाव येथील शाखा अभियंत्याला दिली. त्यांनी गावात जावून पाहणी केली. पण खांब उभे करण्याचे आश्वासन देण्याऐवजी याला आम्ही काही करू शकत नाही. हा कंत्राटदाराचा दोष आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधावा. असा सल्ला दिला.
इतकेच नाही तर वितरण कंपनीने कंत्राटदाराचे देयकही रोखल्याचे सांगितले. पण या विद्युत वितरण कंपनी आणि कंत्राटदाराच्या भांडणात हताश झालेल्या शेतकऱ्यांचे मरण होत असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.