लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतीय संविधानावर ज्यांचा विश्वास आहे, ते नियमानुसार वागतात. त्यांचे आचरणही नियमाला अनुसरूनच असते; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा काय, त्यांच्या सदस्यत्वाचे नियम काय, याबद्दल त्यांनी गोपनीयता बाळगली असून, ते मनुस्मृतीवरच चालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी आरएसएसचे विसर्जन करून गांधी विचार स्वीकारत स्वतःची नोंदणी करून घ्यावी, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
दीक्षाभूमी ते सेवाग्राम आश्रमपर्यंत निघालेली 'संविधान सत्याग्रह पदयात्रा' बुधवारी रात्री वर्ध्यात पोहोचली. यावेळी महात्मा सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, शहीद भगतसिंग यांचे भाचे माजी न्यायमूर्ती जगमोहन सिंग, शैलेश अग्रवाल, काँग्रेस जिल्हा प्रभारी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, खा. अमर काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, अॅड. चारुलता टोकस, शेखर शेंडे, डॉ. अभ्युदय मेघे, प्रवीण हिवरे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज ९९ वर्षे ३६४ दिवस पूर्ण झाले असून, शताब्दी साजरी करीत आहे. या कालावधीत त्यांनी जे वाईट कामे केली, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या सर्वाचा या सत्याग्रह यात्रेच्या निमित्ताने निषेध करीत असून, ही विषारी-विखारी कृत्याची शताब्दी ठरेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
भगतसिंगही राष्ट्रपिता महात्मा गांधींना मानणारेच
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भगतसिंग या दोघांचेही लक्ष्य एकच होते. स्वातंत्र्याकरिता युवकांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वसामान्यांना एकत्र आणण्याची क्षमता गांधीजींमध्ये होती, म्हणूनच आपण बापूंना सॅल्यूट करायला पाहिजे, असे खुद्द भगतसिंगांनी म्हटले आहे. त्यांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी व्हाईसरॉय यांना पत्रही लिहिली होती. त्यामुळे भगतसिंगही बापूंना मानणारेच होते; पण काहींनी याबद्दल अपप्रचार चालविला, असे भगतसिंगांचे भाचे माजी न्यायमूर्ती जगमोहन सिंग म्हणाले.