लोंबकळत्या तारांमुळे वीजपुरवठा खंडीत
By Admin | Updated: July 23, 2014 23:46 IST2014-07-23T23:46:11+5:302014-07-23T23:46:11+5:30
बोपापूर येथील नागरिक वारंवार खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहे. भारनियमनाच्या त्रासासह खंडित वीजपुरवठयामुळे येथील ग्रामस्थांवर बरेचदा काळोखात राहण्याची वेळ येते. वीजपुरवठा खंडित

लोंबकळत्या तारांमुळे वीजपुरवठा खंडीत
पोहणा : बोपापूर येथील नागरिक वारंवार खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त झाले आहे. भारनियमनाच्या त्रासासह खंडित वीजपुरवठयामुळे येथील ग्रामस्थांवर बरेचदा काळोखात राहण्याची वेळ येते. वीजपुरवठा खंडित होण्यास लोंबकळणाऱ्या तारा कारणीभूत असून त्याची दुरुस्ती केली जात नाही. तक्रार करुनही वीज वितरणचे कर्मचारी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबित असल्याने समस्या कायम आहे.
गावातील विद्युत खांबावरील तारा गेल्या अनेक दिवसांपासून लोंबकळत आहे. वाराच्या झोताने गावालगतच असलेल्या अॅड. चांभारे यांचे शेतातून गेलेल्या तारांचा तर सहजतेने स्पर्श करता येईल इतक्या अंतरावर येवून पोहचला. शेताची मशागत करताना विद्युत पुरवठा बंद करूनच मशागत करावी लागते. ही बाब वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहित असतानासुद्धा त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही.
गावात ठिकठिकाणी तारा झाडांना स्पर्शून गेलेल्या आहेत. झाडांच्या फांद्यांपासून त्यास दूर न करता बोपापूर येथून राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या गेलेल्या रस्त्यावरील खांबांचा विजपुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे पथदिवे बंद पडले आहे. वारा किंवा पाऊस यामुळे सदर तारांचा एकमेकांना स्पर्श होवून नेहमीच विद्युत पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे बोपापूर वासियांना अंधारात रहावे लागत आहे.
या लोंबकळत असलेल्या तारा नागरिकांच्या जीवितास धोकादायक आहे. काही भागात तर रस्त्याने जात असलेल्या माणसाला या तारांचा स्पर्श होतो. या तारांचा स्पर्श झाल्याने करंट लागून नाहक प्राणाला मुकण्याची वेळ आहे. मात्र संबंधित विभाग याकडे डोळेझाकपणा करीत सल्याने मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.
यासंबंधी नागरिकांना अनेकदा तक्रारी केल्या, परंतु संबंधीत मस्तवाल कर्मचारी मात्र नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेताना दिसतो. वरिष्ठांनी या गंभीर बाबींकडे तातडीने लक्ष देऊन या लोंबकळत असलेल्या तारा दुरुस्त करण्याची गरज ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.(वार्ताहर)