ंंआर्वी-उपसा सिंचन योजनेला गती
By Admin | Updated: June 18, 2016 01:29 IST2016-06-18T01:29:23+5:302016-06-18T01:29:23+5:30
वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले.

ंंआर्वी-उपसा सिंचन योजनेला गती
रोहणा : वर्धा नदीवर आर्वी तालुक्यातील धनोडी (बहा.) येथे लोअर वर्धा सिंचन प्रकल्पाचे काम २००८ ला पूर्ण झाले. पण पाटचऱ्या नसल्यामुळे सिंचन होत नव्हते त्यामुळे आर्वी उपसा सिंचन योजनेचे काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी जनमंचद्वारे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत या सिंचन योजनेला गती मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
गत दोन वर्षापासून मुख्य कालव्यातून वर्षाला तीन ते चार वेळा पाणी सोडण्यात येते. पण पाटचऱ्या नसल्यामुळे कालव्याच्याच काठावर असणारे शेतकरी डिझेल इंजीनद्वारे सिंचन करीत असतात. मुख्य कालव्याच्या डाव्या बाजूकडील शेतीचे क्षेत्र उंचवट्यामुळे सिंचनाच्या सुविधेपासून वंचित राहणार होते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांना निम्न वर्धा सिंचन प्रकल्पावर आर्वी तालुक्यात उपसा-सिंचन योजना बांधण्याचा प्रस्ताव जनमंचाद्वारे २००९ साली देण्यात आला होता. सदर मागणी लक्षात घेऊन लोअर वर्धा प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये आर्वी-उपसा सिंचन योजनेसाठी आर्थिक तरतूदीला मान्यता प्रदान करण्यात आली. मध्यंतरीच्या काळात प्रकल्पाचे काम निधी अभावी रेंगाळले होते. त्यामुळे जनमंचद्वारे आर्वी-उपसा सिंचन योजनेचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत उपसा सिंचन योजनेचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच प्रकल्प त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने आर्वी उपसा सिंचन योजनेचा इपीसी (इंजिनिअरिंग प्रोक्युरमेंट अँड कंस्ट्रक्शन) पद्धतीद्वारे सुक्ष्म सिंचन करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फणिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे, विजय राऊत यांनी पाठपुरावा केला.(वार्ताहर)