आंबटगोड टमाटरही देताहेत चटके
By Admin | Updated: November 21, 2015 02:27 IST2015-11-21T02:27:36+5:302015-11-21T02:27:36+5:30
सध्या तूर डाळीच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातील वरण बेपत्ता झाले आहे. आता त्याच्याा सोबतीला टमारटरही आले आहे.

आंबटगोड टमाटरही देताहेत चटके
महागाईची झळ कायम : नागरिकांना गावरान टमाट्याची प्रतीक्षा
वर्धा : सध्या तूर डाळीच्या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या ताटातील वरण बेपत्ता झाले आहे. आता त्याच्याा सोबतीला टमारटरही आले आहे. भाजीच्या चवीकरिता असलेल्या टमाटरचे दर पाहून त्याची आंबट गोड चव नागरिकांच्या जीभेला मिळणे कठीण झाले आहे. २० रुपये किलो दराने मिळत असलेले टमाटे दोन दिवस तब्बल ८० रुपयांवर पोहोचले होते. सध्या त्याचे दर ५० रुपयांवर स्थिरावले आहे.
हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. वातावरणात अद्याप गारठा नसल्याने त्याचा परिणाम भाजीपाला पिकांवरही होत आहे. जोपर्यंत गावरान टमाटर बाजारपेठेत दाखल होणार नाही तोपर्यंत भाव उतरणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. यामुळे नागरिकांना गावरान टमाटरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. रोजच्या जेवणाची चव वाढविण्याकरिता टमाटर महत्त्वाचे ठरत आहे. कुठलीही भाजी असो वा चटणी त्यात टमाटर असल्याशिवाय पूर्णत्व येत नाही. परिणामी भाजीबाजारात भाजी घेण्यासाठी गेलेल्या गृहिणी टमाटरचे दर पाहून त्याची खरेदी करावी अथवा नाही, याचा विचार करीत आहेत.
जिल्ह्यात वर्षभर टमाटरचे पीक हे तितकेसे होत नाही. केवळ हिवाळ्यातच मुबलक प्रमाणात टमाटरची आवक होत असते. त्यातही वर्षभर नागरिकांना टमाटर खायला मिळत असले तरी त्याची चव ही गावरान टमाटरसारखी आंबट नसते. त्यामुळे वर्षभर आपण केवळ टमाटर खातो या भावनेवर नागरिकांना समाधान मानावे लागते. गावरान टमाटर हे केवळ हिवाळ्यातच उत्पादित होत असल्याने त्याची चवही केवळ हिवाळ्यातच चाखायला भेटते. परंतु नोव्हेंबर महिना लोटूनही अद्याप गावरान टमाटर पाहिजे त्या प्रमाणात पालावर आलेले नाही. त्यामुळेच दरवर्षी हिवाळ्यात दरवर्षी घसरणारे टमाटरचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनाही गावरान टमाटरची प्रतीक्षा कायम आहे.(शहर प्रतिनिधी)
करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे विलंब
दरवर्षी सहसा नोव्हेंबर महिन्यापर्यंत थंडीचा कडाका जाणवतो. त्यामुळे या महिन्याच्या प्रारंभीच वाजारपेठेत गावरान टमाटर दाखल होतात. परंतु यंदा टमाटर पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने महिनाभरापूर्वी आलेला बहर गळून गेला. परिणामी टमाटर बाजारपेठेत दाखल होण्यास विलंब होत आहे.
गावरान टमाटर जास्त पौष्टिक
हिवाळ्यात उत्पादित येणारे गावरान टामाटर हे जास्त आंबट, चविष्ट आणि पौष्टिक असतात. त्या तुलनेत रसायनयुक्त टमाटर हे तितकेसे पौष्टिक नसतात. तसेच हिवाळ्यात ते अत्यल्प दरातही उपलब्ध होतात.