सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढीच बदल करू शकते
By Admin | Updated: November 18, 2014 23:01 IST2014-11-18T23:01:36+5:302014-11-18T23:01:36+5:30
आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समयसुचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे़ यासाठी बालवयापासूनच सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे

सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेली पिढीच बदल करू शकते
वर्धा : आज खऱ्या अर्थाने निर्भय, कर्तव्यदक्ष, साहसी, समयसुचकता व राष्ट्रप्रेमाने भारावलेल्या नागरिकांची आपल्या देशाला नितांत गरज आहे़ यासाठी बालवयापासूनच सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेम निर्माण करणारे प्रशिक्षण देण्याची गरज आहे़ केवळ सैनिकी मानसिकता व राष्ट्रप्रेमाने भारवलेली पिढीच बदल करू शकते, असे प्रतिपादन माजी प्राचार्य श्याम देशपांडे यांनी केले़
निसर्गरम्य ढगा येथे १६ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या प्रहारच्या १८६ व्या अॅडव्हेंचर कॅम्पच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते़ ‘प्रहार’ समाज जागृती संस्थेच्यावतीने ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान सहा दिवसीय प्रहार अॅडव्हेंचर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते़ शिबिरात ४४ एनसीसी छात्रसैनिकांचा सहभाग होता़ समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ज्ञ डॉ़ राजेंद्र बोरकर तर अतिथी म्हणून माजी प्राचार्य श्याम देशपांडे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, प्रहारचे अध्यक्ष तथा होमगार्ड जिल्हा समादेशक प्रा़ मोहन गुजरकर उपस्थित होते़ बेलखोडे यांनी कृतीशील नागरिक बनविण्यासाठी शिक्षणासह खेळ व साहसी प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले पाहिजे, असे सांगितले़ प्रास्ताविकातून प्रा़ गुजरकर यांनी ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना तरूणाईमध्ये रूजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले़ डॉ़ बोरकर यांनीही मार्गदर्शन केले़
शिबिरात ‘जंगल वाचवा पाणी वाचवा, वन्य प्राण्यांचे संरक्षण करा’ विषयावर चित्रकला व भाषण स्पर्धांचे तर ‘ग्राम स्वच्छता अभियान’ व आपत्ती व्यवस्थापनात तरूणांची भूमिका विषयावर संघचर्चा स्पर्धा घेण्यात आल्या़ शिबिरात पाच संघ तयार करून त्यांना डॉ़ पा़स़ खानखोजे, अशफाक उल्ला खान, उधमसिंग, सरदार भगत सिंग व राणी लक्ष्मीबाई या क्रांतीविरांची नावे देत त्यांच्या जीवनावर मार्गदर्शन करण्यात आले़ शिबिरार्थ्यांनी मातीचे किल्ले तयार करणे, बिन भांड्यांचा स्वयंपाक, पक्षी निरीक्षण व जंगलखोज उपक्रमात सहभाग घेतला़ संचालन प्रा़ रवींद्र गुजरकर यांनी केले तर आभार संतोष तुरक यांनी मानले़ शिबिराला अमोल तडस, चेतन सातपूते यांच्यासह सर्वांनी सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)