तेव्हा ‘ते’ चिमुकल्यांच्या पंखांना यशाच्या भरारीचे बळ देऊन गेले
By Admin | Updated: July 28, 2015 03:10 IST2015-07-28T03:10:23+5:302015-07-28T03:10:23+5:30
पुस्तके ज्ञानाचे स्त्रोत आहे. मिशन इंडिया २०२० ला डोळ्यापुढे ठेवून जे विद्यार्थी आठवी ते दहावीमध्ये असेल त्या प्रत्येकांना या

तेव्हा ‘ते’ चिमुकल्यांच्या पंखांना यशाच्या भरारीचे बळ देऊन गेले
एपीजेंच्या आठवणींचा मोहोळ : बापंूच्या जिल्ह्याशी त्यांचे असेही ऋणानुबंध
राजेश भोजेकर ल्ल वर्धा
पुस्तके ज्ञानाचे स्त्रोत आहे. मिशन इंडिया २०२० ला डोळ्यापुढे ठेवून जे विद्यार्थी आठवी ते दहावीमध्ये असेल त्या प्रत्येकांना या मिशनमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी आतापासूनच त्या दिशेने वाटचाल करावयाची आहे, असा मंत्र मिसाईल मॅन व माजी महामहीम राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी वर्धेतील विद्यार्थ्यांना दिला होता. त्यांच्या एकाएकी निधनाने या आठवणींचा मोहोळ उठला आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या येथील वर्धा एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवाच्या उद्घाटनाचे निमित्त होते. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कमाल वर्धेत आले होते. त्यांनी सुमारे अर्धा तासांवर विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. यावेळी ते विद्यार्थ्यांमध्ये अक्षरश: मिसळून गेले होते. एखादी मोठी व्यक्ती भाषण देत आहे आणि श्रोते ऐकत आहे. असे न होता. ते व्यासपीठावर विद्यार्थ्यांशी हितगुज करीत होते. त्या भाषणादरम्यान ते बोलण्यात आणि विद्यार्थी ऐकण्यात तल्लीन झाले होते. हे पाहुन त्या कार्यक्रमाला उपस्थितांनाही विद्यार्थी आणि त्यांच्यात रंगलेला संवाद ऐकतच राहावे असे वाटत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना खरा देशभक्त होण्यासाठीचे सर्व बाळकडू दिले. आपण केलेली प्रत्येक लहान गोष्ट पुढे देशहितार्थ होते, याचा प्रत्यय येतो. आतापासूनच विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधनावर भर दिला पाहिजे. यावेळी स्वत: लिहिलेल्या पुस्तकांचे दाखले देतानाच महत्त्वही विद्यार्थ्यांना त्याच्याच भाषेत समजावून सांगत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न बघण्याचा आग्रह केला. विद्यार्थी सर्वाधिक गुण वा अधिक टक्केवारीने मोठा ठरत नाही. हे समजावून सांगताना, सर्वाधिक बुद्धीवान आपल्या वर्गात शेवटच्या बाकावर बसत असल्याचे आपल्याला बघायला मिळेल, हे मार्मिक उदाहरण दिले. त्यांनी संपूर्ण भाषणात जगावेगळ्या ज्ञानाची महती पटवून दिली. यावेळी दिलेला मंत्र येथील विद्यार्थ्यांना भविष्यात गगणभरारी घेण्यासाठी बळ देणाराच होता. कार्यक्रमात ते अतिशय साधेपणाने वावरले. तसेच त्यांनी बालवैज्ञानिकांच्या प्रतिकृतींना भेट देऊन त्यांचे तोंडभरुन कौतुकही केले. या मिसाईल मॅनने त्यावेळी येथील विद्यार्थ्यांना खऱ्या देशभक्तीचा परिचयच दिला. ते वर्धेत यापूर्वी दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेतही आले होते. त्यावेळीही त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून खरा देशभक्त होण्यासाठी आतापासूनच आपली वाटचाल कशी करावी, याचा मूलमंत्र दिला होता. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठालाही त्यांनी भेट दिली होती. त्यांची वर्धेकरांसोबत या निमित्ताने एका आगळ्यावेगळ्या नात्याची गुंफन झाली होती. त्यांनी बापूंच्या जिल्ह्यात पाय ठेवताच सेवाग्राम आश्रम आणि पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमाला आवर्जून भेट दिली होती.