आकार विस्तारला; समस्यांचा डोंगर कायमच
By Admin | Updated: December 9, 2015 02:33 IST2015-12-09T02:33:15+5:302015-12-09T02:33:15+5:30
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा विधानसभा क्षेत्राचा आकार दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत नागरिकांना सुविधा पुरविण्यात मात्र सदैव दुर्लक्ष झाले आहे.

आकार विस्तारला; समस्यांचा डोंगर कायमच
रूपेश खैरी वर्धा
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा विधानसभा क्षेत्राचा आकार दिवसागणिक वाढत आहे. त्या तुलनेत नागरिकांना सुविधा पुरविण्यात मात्र सदैव दुर्लक्ष झाले आहे. विधानसभा क्षेत्रालगत असलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम व विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमाने क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. वर्धा शहर व सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे)चा भाग वगळता इतर गावे या क्षेत्रात येतात. दोन्ही शहरे मिळून एकूण २ लाख ४१ हजार २३६ मतदार आहेत. एक नगरपरिषद व नव्याने अस्तित्वात आलेली सेलू येथील नगरपंचायत या विधानसभा क्षेत्रात आहे. विधानसभा अस्तित्वात आली तेव्हापासून येथे १२ आमदारांनी सत्ता भोगली. यात बापूराव देशमुख काँगे्रस, रामचंद्र घंगारे माकप, वसंत कार्लेकर काँगे्रस, माणिक सबाणे अपक्ष, प्रा. सुरेश देशमुख अपक्ष, डॉ. पंकज भोयर भाजप यांनी प्रत्येकी एक वेळा तर प्रमोद शेंडे यांनी तब्बल सहा वेळा आमदार पद भूषविले. असे असले तरी क्षेत्राच्या विकासासाठी कुणाकडूनही विशेष प्रयत्न झाले नसल्याचे दिसते. शहरात पूर्वीच्या लोकसंख्येनुसार असलेल्या सुविधा आज पुरविण्याचा प्रयत्न होत आहे. विस्तारीकरणानुसार सुविधांचा विस्तार होणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. शैक्षणिक जाळे वाढले, त्या तुलनेत रोजगाराची सुविधा निर्माण झाली नाही. उद्योगाच्या नावावर भूगाव येथील स्टील प्लांट आहे. एमआयडीची झाली; पण त्याचा विशेष लाभ नाही. बेरोजगारांची फौज आहे. गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी दोन पोलीस ठाणे मंजूर झाले; पण अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही.
उड्डाण पुलाचा विस्तार
विधानसभा क्षेत्रात महत्त्वाच्या ठरणाऱ्या आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलाच्या विकासाचे काम अद्याप रखडलेले आहे. पुलाच्या विस्ताराकरिता मंजुरी मिळाली तरी काम अडले आहे.
जिल्ह्याचे स्थळ असलेल्या या शहरात वाहतुकीच्या सोईकरिता कुठलाही पूल निर्माण झाला नाही. हिंगणघाटप्रमाणे येथे एखादा तरी पूल होणे अपेक्षित होते. याकडे लोकप्रतिनिधंीनी लक्ष देण्याची मागणी आहे.
वर्षानुवर्षांपासूनची वाहनतळाची समस्या कामयच
वर्धा शहरातील रस्ते व वाहनतळाची समस्या पूर्वीपासून कायमच आहे. शहराची लोकसंख्या वाढली; पण रस्त्यांचा विकास करण्याकडे नेहमी दुर्लक्ष झाले. मोठा रस्ता म्हणून केवळ मुख्य मार्ग दुतर्फा झाला आहे. वाढती लोकसंख्या व वाहनांची संख्या लक्षात घेता शहरातील बॅचलर रोडचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. या रस्त्यांवरून वाहन चालविणेही कठीण झाले आहे.
अरूंद रस्ते व त्याच्या मदतीला नसलेली वाहनतळाची सुविधा वाहतुकीच्या समस्येत भर घालत आहे. शहरात एकाही ठिकाणी वाहनतळ नसल्याने रस्त्याच्या कडेला कुठेही जागा मिळेल तिथे वाहने उभी करण्यात येतात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे दिसून येते. ही समस्या निकाली काढण्याकरिता अनेक आंदोलने झालीत; पण त्याचा कुठलाही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे. ही समस्या मार्गी लावण्याची मागणी जोर धरत आहे.
सार्वजनिक शौचालय वर्धेकरांकरिता दिवास्वप्नच
वर्धेत केवळ शहरातीलच नव्हे तर बाहेर गावातील नागरिकांची सदैव वर्दळ राहिली आहे. सेवाग्राम येथील आश्रमात विदेशी पर्यटकही येत असतात. असे असताना वर्धा शहरात एकाही ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे शहराची केवळ जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरही बदनामी होत आहे.
बाजारहाटाकरिता येत असलेल्या महिलांची सार्वजनिक शौचालय नसल्याने मोठीच कुचंबना होत आली आहे. ती अजूनही कायम आहे. या महिलांना बाजारात कुणाच्या ना कुणाच्या घराचा आधार घेण्याची वेळ येते.