१३१ पैकी ८५ व्यक्तींचे स्त्राव नमुने ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:12+5:30
कंटेनरमध्ये दाटून बसून भिवंडी येथून अलाहाबाद येथे जात असलेल्या चालकासह एकूण ४५ व्यक्तींना तळेगाव श्या.पंत शिवारात असलेल्या बॉर्डर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना इन्स्ट्रट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे स्त्राव तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.

१३१ पैकी ८५ व्यक्तींचे स्त्राव नमुने ‘निगेटिव्ह’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नसला तरी कोविड-१९ पासून दक्षता म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना बाधित देश तसेच जिल्ह्यांमधून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले. याच होम क्वारंटाईनच्या कालावधीत काहींची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. प्रकृती बिघडलेल्या या व्यक्तींसह आणखी काही व्यक्तींचे असे एकूण १३१ व्यक्तींचे स्त्राव नमुने आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ८५ व्यक्तींचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले असून या कोरोनामुक्त असल्याचे पुढे आले आहे. तर उर्वरित ४६ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांच्या अहवालाची जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्रतीक्षा आहे.
कंटेनरमध्ये दाटून बसून भिवंडी येथून अलाहाबाद येथे जात असलेल्या चालकासह एकूण ४५ व्यक्तींना तळेगाव श्या.पंत शिवारात असलेल्या बॉर्डर सील पॉर्इंटवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर या व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना इन्स्ट्रट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे स्त्राव तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याच ४५ व्यक्तींसह आणखी एका व्यक्तीचा स्त्राव नमुन्याचा अहवाल जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला प्राप्त झालेला नाही. बुधवारी हे प्रलंबित अहवाल प्राप्त होतील असा विश्वास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
सध्यास्थितीत एक व्यक्ती आयसोलेशनमध्ये असला तरी वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण अद्याप आढळलेला नाही. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आणि इतरांनाही निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्तींने घरातच थांबण्याचे आवाहन आरोग्य विभागासह समाजातील विविध स्तरातून करण्यात येत आहे.
१,९२६ व्यक्ती गृह विलगीकरणात
कोरोना बाधित राज्यांसह जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात १५ हजार ६४९ व्यक्ती आल्याची नोंद घेण्यात आली आहे. या संपूर्ण व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्यांना गृहविलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १३ हजार ७२३ व्यक्तींचा गृहविलगीकरणाचा कालावधी संपल्याने तसेच त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे न आढळल्याने या व्यक्तींना गृहविलगीकरणातून मुक्त करण्यात आले आहे. तर सध्यास्थितीत १ हजार ९२६ व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत.
आर्वीत आणखी चौघांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का
आर्वीत आणखी चार व्यक्तींच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. शिवाय त्यांना आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आर्वी येथे खडकपुरा वॉर्डात नागपूर (मनंसर) येथून दुचाकीने एक व्यक्ती आल्याची तर अमरावती येथून दोघे व्यक्ती पाहूण पणासाठी आल्याची शिवाय वाघोली पुणे येथून एक व्यक्ती असे एकूण चार व्यक्ती आर्वी शहरात आल्याची माहिती पालिकेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर या चारही व्यक्तींची आरोग्य तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.