संतांनी कधीही चमत्कार मानले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:20 IST2017-11-17T00:20:38+5:302017-11-17T00:20:55+5:30
महाराष्ट्राला सुधारणावादी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या कार्याचा वा साहित्याचा नीट अभ्यास केला असता त्यांनी कधीही चमत्कार मानला नाही वा आपल्या साहित्यात तसा उल्लेखही केला नाही.

संतांनी कधीही चमत्कार मानले नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाराष्ट्राला सुधारणावादी संतांची परंपरा लाभली आहे. या संतांच्या कार्याचा वा साहित्याचा नीट अभ्यास केला असता त्यांनी कधीही चमत्कार मानला नाही वा आपल्या साहित्यात तसा उल्लेखही केला नाही. याउलट सर्वच संतांनी लोकांची जडणघडण वैज्ञानिक दृष्टीकोनातून करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन अ.भा. अंनिसचे राज्य पदाधिकारी संजय इंगळे तिगावकर यांनी केले.
अनेकांत साध्याय मंदिर येथे डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृत्यर्थ सोमवारी ३७० वा अभ्यास वर्ग पार पडला. यात ‘संत साहित्यातील वैज्ञानिक दृष्टीकोन’ विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. इंगळे पूढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, चार्वाक, मुक्ताबाई, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज आदी संतांनी चातुवर्ण व्यवस्थेवर आसूड ओढत लोकशाहीची बिजे रोवण्याचे काम केले; पण काही पोटभरू लोकांनी या संतांच्या मागे चमत्काराच्या कथा जोडून संतांचे समतावादी कार्य मात्र दूर ठेवले. लोकांनीही संतांचे चमत्कार लक्षात ठेवले व त्यांचे खरे कार्य विसरले. यामुळे आज या संतांचे खरे कार्य समजून घेण्याची गरज आहे. संत तुकारामांचा छळ करणारे व त्यांचा खून करून त्यांचा विचार संपवू पाहणाºया त्या वेळच्या व आजच्या धर्म ठेकेदारांपासून सावध राहून संतांचा वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेत त्यांची प्रबोधनाची परंपरा पूढे नेण्याचा प्रयत्न परविर्तनवादी कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. काही अभंग व वचनांचे दाखलेही त्यांनी उपस्थितांसमोर ठेवले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे अरुण चवडे, गजेंद्र सुरकार व रवींद्र कडू उपस्थित होते.
संजय भगत यांनी क्रांतीगीते सादर केली. संचालन सुनील ढाले यांनी, परिचय व प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले तर आभार नरेंद्र कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. अजय सावरकर, सुधाकर मिसाळ, अनिल मुर्डीव, अॅड. भास्कर नेवारे, पांडुरंग राजरत्न, सुनील सावध, अॅड. गोडघाटे, डॉ. भेले आदींनी सहकार्य केले.