गिट्टीमुळे रस्ते झाले निसरडे

By Admin | Updated: July 18, 2016 00:32 IST2016-07-18T00:32:11+5:302016-07-18T00:32:11+5:30

उन्हाळ्यात करावयाच्या रस्ता डागडुजीच्या कामाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.

Roads are slippery due to ballast | गिट्टीमुळे रस्ते झाले निसरडे

गिट्टीमुळे रस्ते झाले निसरडे

वाहनांना अपघाताचा धोका : डागडुजी नंतरही समस्या कायमच
वर्धा : उन्हाळ्यात करावयाच्या रस्ता डागडुजीच्या कामाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पावसाळ्याला सुरूवात होताच शहरातील रस्त्याचे अंतरंग उघडे पडले. पहिल्याच पावसानंतर शहरातील प्रमुख डांबरी रस्ते उखडले असून गिट्टी बाहेर पडली आहे. त्यामुळे सदर रस्ते निसरडे झाले आहे. यातून वाहन चालविताना चालकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते.
या रस्त्यावरील गिट्टीच्या कणांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना त्रास सहन करावा लागतो. अशात रस्त्यावरून एखादे मोठे वाहन गेल्यास धुळीचे लोट उडतात. शिवाजी चौक ते आर्वी नाका आणि आरती चौक ते धुनिवाले मठापर्यंतच्या रस्त्याची सध्या हीच स्थिती झाली आहे. या रस्त्याने वाहन चालविताना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच गिट्टीमुळे दुचाकी सारखे वाहन घसरून अपघाताचा धोका बळावला आहे. हे दोन्ही रस्ते वर्दळीचे असून या रस्त्यावर शाळा-महाविद्यालय, बँक, पतसंस्था, शासकीय कार्यालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने आहे. कामानिमित्त ये-जा करणाऱ्यांची दिवसरात्र येथे वर्दळ असते. रस्त्याची दैनावस्था झाली असल्याने येथे दुर्घटनेचा धोका बळावला आहे. या रस्त्यांचे डांबरीकरण गरजेचे झाले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

खड्ड्यांमध्ये विटांच्या चुरीचा होतोय वापर
वर्धा-पवनार मार्गावर असलेले खोल खड्डे बुजविण्यासाठी विटांच्या चुरीचा वापर करण्यात आला आहे. पाऊस असताना खड्ड्यात टाकलेली चुरी पाण्यामुळे दबून होती. मात्र पावसाचा जोर ओसरताच ही चुरी वाळल्याने त्याचा रस्त्यावर धुराळा उडत आहे. अशातच एखादे जड वाहन गेल्यास मागाहुन येत असलेल्या दुचाकी चालकाला धुळीमुळे क्षणभर काही नजरेस पडत नाही.या मार्गाने शाळकरी मुलेही अधिक प्रमाणात ये-जा करतात. त्यांनाही या धुळीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे श्वसनाचे आजार जडण्याचा धोका आहे.

 

Web Title: Roads are slippery due to ballast