१०४ गावांमध्ये जाणार पुनर्जागरण यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 02:22 IST2015-06-24T02:22:22+5:302015-06-24T02:22:22+5:30
शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे.

१०४ गावांमध्ये जाणार पुनर्जागरण यात्रा
योजनांची जनजागृती : जिल्हाधिकाऱ्यांकडून नियोजनाचा आढावा
वर्धा : शासनाच्या योजनांबाबत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी नेहरू युवा केंद्राच्या मार्फत आठही तालुक्यातील एकूण १०४ गावांमध्ये पुनर्जागरण यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेतून नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. युवकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष रेवतकर, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यासह सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी सलील यांनी आठही तालुक्यातील प्रत्येकी १३ गावामध्ये पुनर्जागरण यात्रा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. संबंधित गावातील ग्रामसेवक, आरोग्य सेवकांसह गटविकास अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. या कार्यक्रमांतर्गत प्रधानमंत्री जन-धन योजना, संसद आदर्श गाव योजना, स्वच्छ भारत अभियान, निर्मल गाव योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ आदी योजनांसह राज्य शासनाच्या योजनांचीही पथनाट्याद्वारे जागृती करण्यात येणार आहे. याकरिता कॉर्नर बैठक, ग्रामपंचायत चर्चा, श्रमदान, नुक्कड नाटक, युवा संसद या माध्यमातून ग्रामीण स्तरावर कार्यक्रम राबविणार आहे. प्रत्येक विभागाने शासकीय योजनांची माहितीपत्रके, घडीपुस्तिका नेहरू युवा केंद्रांना उपलब्ध करुन द्यावी, योजनांची माहिती तळागळातील लोकांपर्यंत पोहचविण्यास मदत होईल, असेही सलील यावेळी म्हणाले. नेहरू युवा केंद्राच्या जिल्हा समन्वयक ज्योती मोहिते यांनी पुनर्जागरण यात्रा कार्यक्रमाबाबत सविस्तर सादरीकरण केले. (स्थानिक प्रतिनिधी)