सामान्यांच्या समस्या निकाली काढा
By Admin | Updated: December 11, 2014 23:12 IST2014-12-11T23:12:35+5:302014-12-11T23:12:35+5:30
महाराष्ट्र राज्य जनवादी महिला संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवसानिमित्त जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यात याव्या, या मागणीसाठी संघटनेच्या उपाध्यक्ष

सामान्यांच्या समस्या निकाली काढा
वर्धा : महाराष्ट्र राज्य जनवादी महिला संघटनेच्या वतीने ९ डिसेंबर रोजी मानवाधिकार दिवसानिमित्त जनसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या निकाली काढण्यात याव्या, या मागणीसाठी संघटनेच्या उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले.
निवेदनातून सबसिडीच्या नावावर होणारी जनतेची लूट थांबवावी, जुन्याच पद्धतीने सिलिंडर कमी भावात द्यावे, धान्य माफक दरात द्यावे, रॉकेलचा काळाबाजार थांबवावा, प्रत्येकाला शिधापत्रिका द्याव्या, दारूविक्री बंद करावी, निराधारांचे बंद झालेले पगार तत्काळ द्यावे, विधवा परित्यक्ता, एकल महिलांना बीपीएल कार्ड द्यावे, महिलांना संरक्षण देऊन चौकशी करण्याकरिता महिला अधिकारी नेमून वेगळा कक्ष स्थापन करावा, मानव अधिकार कायद्यात सुधारणा करून आनंदी, निर्भय व स्वतंत्रपणे जीवन जगता यावे, याकरिता दुरूस्ती करावी, अंधश्रद्धा, बुवाबाजी, नरबळी करणाऱ्या गुन्हेगाराला कठोर शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला मदत द्यावी, १९९५ पासून वास्तव्य ज्या जागेवर आहे त्यांना घराचे पट्टे द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांवर सभागृहात चर्चा करण्यात आली.
जनसामान्यांचे प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावे, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात निर्मल वाघ, रमाबाई चाटे, मंगला पारलेवार, बेबी खोडतकर, नलू चाफले, उमा वैद्य, अनुसया झाडे, दुर्गा काकडे, कुंदा घंगारे, गीता ठाकूर, नजमा पठाण उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)