तहसीलदारांनी घर गाठत दिली शिधापत्रिका
By Admin | Updated: October 10, 2015 02:39 IST2015-10-10T02:39:59+5:302015-10-10T02:39:59+5:30
येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

तहसीलदारांनी घर गाठत दिली शिधापत्रिका
‘त्या’ शेतकरी कुटुंबावर मदतीचा ओघ : वर्धेच्या युवकांनी दिला किराणा व धान्य
वायगाव (निपाणी): येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग याने नापिकीचे संकट व कर्जाचा वाढता भार यामुळे घरासमोर असलेल्या कडू लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर या शेतकऱ्याच्या कुटुंबाने दोन दिवस वरणाचे पाणी पिवून काढले. हे विदारक वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात उजेडात आणताच त्या कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. शुक्रवारी वर्धेचे तहसीलदार राहुल सारंग यांनी शेतकऱ्याचे घर गाठत त्याला अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली.
तत्पूर्वी सकाळीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट देत शेतकऱ्याच्या कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत केली. तर वर्धेतील काही युवकांनी या शेतकऱ्याचे घर गाठत किराणा व धान्याची मदत दिली. शिवाय वेळ प्रसंगी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.
मक्त्याने शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्या नावे शेताचा सातबारा नसल्याने त्याला शासकीय मदत मिळणे कठीण असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या घराकडे कुणीही फिरकले नाही. शिवाय या कुटुंबाकडे शिधापत्रिका नसल्याने त्यांना धान्यही मिळाले नव्हते. याची माहिती ‘लोकमत’च्या माध्यमातून मिळताच अधिकाऱ्यांसह काही समाजिक संघटनांनी या शेतकऱ्याच्या घराकडे धाव घेतली. यात तहसीलदार राहुल सारंग, नायब तहसीलदार प्रिती डुडूरकर यांनी शेतकऱ्याच्या घराला भेट देत अंत्योदय योजनेत शिधापत्रिका दिली. यावेळी सरपंच गणेश वांदाडे व जि.प. सदस्य मिना वाळके यांची उपस्थिती होती. कृषी विभागाचे मंडळ अधिकारी जवळेकर, शेळके व मेघे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देत या कुटुंबाची विचारपूस केली. सोबतच त्यांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ही रक्कम शेतकऱ्याच्या मुलीच्या स्वाधीन करण्यात आली.(वार्ताहर)