रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरूच
By Admin | Updated: May 27, 2014 23:55 IST2014-05-27T23:55:55+5:302014-05-27T23:55:55+5:30
रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत.

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरूच
वर्धा : रेल्वे, बस व अन्य प्रवास साधनांच्या तुलनेत सर्वाधिक पसंती रेल्वेला दिली जाते. यामुळे प्रत्येक प्रवासी रेल्वेगाडीमध्ये गर्दी असल्याचे दिसते. याच गर्दीचा फायदा घेत दलाल सक्रीय झाले आहेत. दलालांद्वारे प्रवाशांची अक्षरश: लूट केली जात असून ४00 रुपयांच्या एका तिकीटासाठी प्रवाशांना ६00 रुपये मोजावे लागत आहेत. सध्या तत्काल तिकीटांमध्येही काळाबाजार होत असल्याने प्रवाशांना तिकिटाच मिळत नसल्याचेच दिसते. उन्हाळ्याच्या सुट्या संपत आल्या असून लग्नसराईदेखील आटोपत आहे. यामुळे नागरिकांची आपापल्या गावांकडे परतण्याची लगबग सुरू झाली आहे. उन्हाळ्याच्या सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये रेल्वे, एसटी फुल्ल राहत असल्याने प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात; पण या दोन्ही सिझनमध्ये ट्रॅव्हल्स धारकांद्वारे प्रवासी तिकीटात मोठी भाववाढ केली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. सध्या नागरिकांची आपापल्या गावी परतण्याची लगबग सुरू झाल्याने रेल्वेच्या तिकीटासाठी सक्रीय असलेल्या दलालांची लॉटरीच लागली आहे. रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना एका तिकीटमागे १00 ते ३00 रुपये आगाऊ मोजावे लागत आहेत. रेल्वेचे आरक्षित तिकीट आधीच काढून ठेवायचे असेल व त्यात कन्फर्म तिकीटाची हमी द्यायची नसेल तर दलाल प्रत्येक तिकीटावर १00 ते २00 रुपये आगाऊ आकारतात. यातील रेल्वेच्या तात्काळ आरक्षित तिकीटांसाठी कन्फर्म सिटसाठी २00 ते ४00 रुपये आगाऊ आकारले जात आहेत. यामुळे प्रवाशांना ४00 रुपयांचे तिकीट असेल तर ते तिकीट ६00 ते ८00 रुपयांमध्ये खरेदी करावे लागत आहे. पुलगाव ते हावडा कोलकाता या प्रवासाचे साधे आरक्षित तिकीट ४८0 रुपयांचे होते. यात तात्काळ तिकीट काढल्यास सुमारे १५0 रुपये रेल्वेला अधिकचे द्यावे लागतात. याच तिकीटा दलालांकडून घेतल्यास ६३0 रुपये प्रती तिकीटाऐवजी २00 रुपये आगाऊ खर्च करून म्हणजे ८३0 ते ९00 रुपयांमध्ये घ्याव्या लागतात. यात तात्काळ आरक्षणाच्या शुल्कासह दलालाचे २00 ते ३00 रुपये अधिक मोजावे लागत असल्याने प्रवाशांचे कंबरडेच मोडले जात आहे. असाच प्रकार मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई, नवी दिल्ली, हैद्राबाद आदी ठिकाणच्या तिकीटांबाबत घडत आहे. ४00 रुपयांच्या तिकीटासाठी ६00 रुपये द्यावे लागत असल्याने एका कुटुंबात जर ६ सदस्य असतील तर केवळ प्रवासासाठी त्यांना ३ हजार ६00 रुपये मोजावे लागतात. यात दलाल १२00 रुपयांचा नफा कमवित आहेत. हा प्रकार सर्रास सुरू असल्याने रेल्वे प्रशासनाचीही यास संमतीच असल्याचे दिसते. रेल्वेच्या आरक्षित तिकीटांमध्ये प्रवाशांची लूट होत असल्याबाबत अनेकदा रेल्वे प्रशासनाला निवेदने देण्यात आलीत; पण कुठलीही कारवाई केली जात नाही. बहुतांश रेल्वे स्थानकावरील तिकीट देणार्या कर्मचार्यांशीही दलालांचे साटेलोटे असल्याचे उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा रेल्वे स्थानकावरच असा प्रकार घडला. यामुळे वादही निर्माण झाला होता. पुलगाव, धामणगाव (रेल्वे), सेवाग्राम या रेल्वे स्थानकांवरही दलाल सक्रीय असून प्रवाशांची लूट होत आहे. या प्रकाराबाबत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय व्यवस्थापक आणि मुख्य व्यववस्थापकांपर्यंंत तक्रारी करण्यात आल्यात; पण कुणीही कारवाई केली नाही. या प्रकारामुळे रेल्वेला प्रवाशांशी कसलेही देणेघेणे नसल्याचे दिसते. किमान रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापनाने तरी नागपूर विभागातील दलाल पद्धत बंद करणे अपेक्षित आहे.(कार्यालय प्रतिनिधी)