पोलीस कोमात अन् चोरटे जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:07+5:30
आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या वायगाव (नि.) येथील पाच दुकानांचे कुलूप तोडून तर आंजी (मोठी) येथे एका कुलूपबंद घराला टार्गेट करून अज्ञात चोरट्यांनी मुद्देमाल लंपास केला. इतकेच नव्हे तर चोरट्यांनी तळेगाव (श्या.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारातून कापूस चोरून नेला. या तिन्ही घटना मागील २४ तासांत घडल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. शिवाय परिसरात चोरट्यांबाबतची दहशत निर्माण झाली आहे.
आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन्यांचा शोध घेतला. परंतु, त्यांच्या हाती काहीच लागले नाही.
शेतातून परतल्यावर घराचे कुलूप उघडे दिसल्याने खेडकर यांनी घरात प्रवेश करून बारकाईने पाहणी केली असता चोरीचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर घटनेची माहिती खरांगणा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच आंजी (मोठी) पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली आहे. तर दुसरी घटना तळेगांव (शा.पं.) नजीकच्या बहादरपूर शिवारात घडली. अज्ञात चोरट्यांनी रविंद्र रमेश टर्के यांच्या शेतात प्रवेश करून शेतातील वेचणी करुन ठेवलेला सुमारे ८० किलो कापूस चोरून नेला. यामुळे शेतकरी टर्के यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी शेतकरी रविंद्र टर्के यांच्या तक्रारीवरून तळेगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
पाच दुकाने फोडली
वायगाव (नि.) : येथील पाच दुकानाचे कुलूप रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल चोरून नेला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. प्रफुल झोटिंग, श्रीकांत पाल, दिलीप वांदाड यांच्या दुकानातून चोरट्यांनी मुद्देमाल पळविला. तर मेहबूब पान सेंटर आणि बछु भाई हॉटेल या दुकानातून खाद्य पदार्थांसह रोख रक्कम चोरून नेली. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने गावात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. चोरीची माहिती मिळताच वायगाव पोलीस चौकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.