पाटचरीचे खोदकाम सदोष
By Admin | Updated: May 21, 2016 02:09 IST2016-05-21T02:09:49+5:302016-05-21T02:09:49+5:30
येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे.

पाटचरीचे खोदकाम सदोष
वाहिपेरीच्या अडचणी वाढल्या : मोक्का पाहणी करण्याची मागणी
रोहणा : येथील वेणुबाई शंकरराव बेलवे यांच्या शेतातून केलेल्या पाटचरीचे खोदकाम सदोषरीत्या केले आहे. त्यामुळे या महिला शेतकऱ्याची बरीच जमीन गेली. उरलेली शेतीत वाहीपेरीच्या अडचणी वाढल्या असून ओलीत शक्य नाही. त्यामुळे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष खोदकाम पाहून आपल्याला न्याय देण्याची मागणी सदर शेतकऱ्याने केली आहे.
वेणुबाई शंकरराव बेलगे यांचे वाई मौज्यात ००.९१ हेक्टर आराजीचे सर्व्हे नं. १६१ असे शेत आहे. सदर शेत रोहणा उपलघुकालव्याला लागून उजव्या भागाला आहे. पाटबंधारे विभागाने उपलघु कालव्यातील पाणी सिंचनासाठी वापरता यावे म्हणून त्यांच्या शेताच्या मध्यभागातून पाटचरी खोदली आहे. पाटचरीद्वारे पाणी शेतात नेण्यासाठी शेतजमीन सखल भागात असणे आवश्यक असते. पाटचरी उथळ भागात असेल तर पाणी शेतात नेता येणे शक्य असते. ही बाब माहिती असूनही बेलगे यांच्या शेतातील पाटचरी शेत जमिनीपासून सहा ते सात फूट खोल खोदण्यात आली. त्यामुळे पाटचरीतून येणारे पाणी शेताच्या उंचीपर्यंत वर कसे चढेल हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर खोदकामामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या शेताचे दोन तुकडे पडले. खोदलेली माती बाजुला टाकल्याने रस्त्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर शेतातून आधी उपकालव्यासाठी व आता पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे उरलेल्या अत्यल्प जमिनीतून यंदाच्या खरीप हंगामात कसे पीक घ्यावे हा गहन प्रश्न महिला शेतकरी व त्यांच्या मुलांसमोर निर्माण झाला आहे.
शेतजमीन संपादनासाठी होणारा खर्च व एवढा खटाटोप करूनही सिंचन शुन्य असा प्रकार येथे पाहावयास मिळत आहे. पाटबंधारे विभागाचे काम प्रत्यक्ष मोक्यावर पाहावे अशी मागणी सदर शेतकऱ्यांचे निम्न वर्धा कालवे विभाग पिपरी (वर्धा) चे कार्यकारी अभियंता, खासदर रामदास तडस, आमदार अमर काळे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आपल्याला न्याय मिळावा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.(वार्ताहर)
शेताच्या मध्यभागातच खोदली पाटचरी
वेणूबाई बेलवे यांच्या शेतातून आधी उपकालव्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. यानंतर आता पुन्हा पाटचरी साठी जमीन संपादित केल्यामुळे अत्यल्प जमीन त्यांच्याकडे उरली आहे. या उरलेल्या जमिनीतून कसे पीक घ्यावे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सिचनासाठी एवढा खटाटोप केल्यावरही सिंचन किती होते हा प्रश्नच असल्याचे बेलवे यांचे म्हणणे आहे. शेताच्या मधातूनच उपकालवा गेल्यामुळे अनेक अडचणी येत आहे.