वर्धा : महात्मा फुले लिखित बळीराजाच्या अतुल स्वामी वीर... या अखंडाने रविवारी येथील बजाज चौक परिसरात बळीराजा महोत्सव झाला. या महोत्सवात बळीराजाचा उपेक्षित असून या महान राजाची ओळख सर्वांना होण्याकरिता कार्य करण्याची गरज या महोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली. किसान अधिकार अभियानच्या आयोजनात असलेल्या या महोत्सवाचा समारोप रविवारी सकाळी एका रॅलीने करण्यात आला. महोत्सवाच्या प्रारंभी महात्मा फुल्यांचे अखंड व परिवर्तनवादी क्रांतीगीत गीते संजय भगत, प्रकाश कांबळे, सुनील ढाले, गजेंद्र सुरकार, जालंधरनाथ यांच्या समुहाने सादर केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी बळीमहोत्सवाची प्रास्ताविक भूमिका मांडत किसान अधिकार अभियानच्या आंदोलनाची पार्श्वभूमीवर व बळीराजाचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट केले. दरवर्षी देण्यात येणाऱ्या निऋती व बळीराजा गौरव पुरस्कारात यावर्षी तळेगाव (टा.) येथील तेजस्विनी दारूबंदी महिला मंडळ व आमगाव (ख.) ता. सेलू येथील हागणदारी मुक्त गाव करणाऱ्या स्त्रियांच्या गटाला गौरविण्यात करण्यात आले. यावेळी ओबीसी मुक्ती मोर्चाचे संयोजक नितीन चौधरी (नागपूर) यांनी बळीराजा व शेतकरी कष्टकरी स्त्री पुरूषांच्या प्रश्नांसंबंधात विचार व्यक्त केले. चौधरी म्हणाले, आपल्या संस्कृतीचा महामानव बळीराजा आज उपेक्षित केला गेला आहे. असुरचा सांस्कृतिक ठेवा नष्ट करून यज्ञ करणाऱ्या सुरांनी केलेले आक्रमण आम्ही स्वीकारले आहे. त्यामुळे आता तरी आमची प्रतिक आम्ही उभी केली पाहिजेत. फुल्यांचे पुतळे, तुकारामाचे पुतळे किंवा शेतकऱ्यांचे पुतळे उभारून प्रेरणास्थळ निर्माण करण्याची गरज त्यांनी प्रकर्षाने मांडली. किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी बळीराजाचे अखंड साहित्य लिहिले व आज आम्हाला न्याय्य हक्कासाठी लढण्याची प्रेरणा दिली. त्या फुल्यांमुळे आम्ही शुद्रातिशुद्र शिक्षण घ्यायला लागलो. त्यांचा स्मृतिदिन आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करून कृतज्ञता व्यक्ती करीत नाही. तो दिन आता किसान अधिकार अभियान आंदोलन करून साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी सकाळी ८ वाजता रॅली वर्धा शहरातून बळीराजा सन्मान निघाली. छत्रपती शिवाजी चौक, महात्मा गांधी पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून बजाज चौकात बळी महोत्सव कार्यक्रम मंडपात रॅली व आत्मचिंतन २४ तास कार्यक्रमाचा शहरातील पुरोगामी-परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. याप्रसंगी श्रीकांत बारहाते, सुषमा शर्मा, डॉ. सुभाष खंडारे, नितीन झाडे, उदय मेघे, संजय इंगळे तिगावकर, हरिष इथापे, भास्कर इथापे, प्रा. सोनुरकर, पंकज वंजारे, डॉ. चेतना सवाई, सुनील ढाले, हर्षबोधी, सुचिता इंगोले, ज्ञानेश्वर ढगे, अनंत ठाकरे, बाळासाहेब मिसाळ, जगदिश चरडे, वारलु मिलमिले, पपिता राऊत, प्रशांत गुजर आदिंनी विचार मांडले. अविनाश काकडे, नागपूर यांनी बळीराजाच्या तीन पावलांची पार्श्वभूमि मांडून आजचे तीन पावले म्हणजे शिक्षण, वाणी व संपत्ती बहुजनांची पुनर्स्थितीत करण्याची मांडणी केली. सर्वांचे आभार मानात येत्या आंदोलनाची भूमिका व कार्यक्रमाचे संचालन प्रा. नूतन माळवी यांनी विशद करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. किसान अधिकार अभियान, सत्यशोधक महिला प्रबोधिनी, आप, युवा सोशल फोरम, हॉकर्स असोसिएशन, सहकारी बँक ठेविदार संघटना, महात्मा सहकारी साखर कारखाना कर्मचारी कृती समिती, पॉलीहाऊस शेडनेट उत्पादक समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महोत्सवाकरिता परीश्रम घेतले.(प्रतिनिधी)
बळी महोत्सवात शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
By admin | Updated: November 1, 2016 01:53 IST