ढगाळ हवामानामुळे कांदा पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 05:00 AM2020-04-10T05:00:00+5:302020-04-10T05:00:02+5:30
काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे शेतातील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने परिसरातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतातील पीक वाचविण्यासाठी औषधांची फवारणी करीत पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केल्यानंतर औषधांची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पाल पिवळी पडून त्याच्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
काही शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याचे महागडे बियाणे आणून टाकले होती. परंतु, या ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्या कांद्याची पाल पिवळी पडून करपू लागली आहेत. शेतकरी बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहेत. पालीवर करपा आणि गाभ्यामध्ये माव्यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस व जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती, त्या शेतकऱ्यांचा कांदा निघाला असून काहींची काढणी सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक ठप्प आहे. परिणामी, अनेकांचा काढणी करून ठेवलेला कांदा शेतातच पडून आहे. तर काही शेतकऱ्यांनी कांदा लागवड १५ जानेवारीपासून ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत केली आहे. त्या शेतकºयांची कांदा जगविण्यासाठी धडपड सुरु आहे.
परीसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे असून सध्या सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. कांदा पिकावरच काही शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित अवलंबून असल्यामुळे शेतकरी सध्या कांदा जगविण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळत आहे. तर काही शेतकरी कांदा निघूनही कोरोनामुळे सर्व ठप्प असल्यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे.