कर्जमाफीची फुंकर नको वीज, पाणी द्या-वाघोडावासी
By Admin | Updated: July 21, 2015 02:50 IST2015-07-21T02:50:22+5:302015-07-21T02:50:22+5:30
कर्जमाफीसाठी गाव विकायला काढल्यामुळे एका रात्रीतून शासन-प्रशासनासह राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधलेल्या

कर्जमाफीची फुंकर नको वीज, पाणी द्या-वाघोडावासी
वर्धा : कर्जमाफीसाठी गाव विकायला काढल्यामुळे एका रात्रीतून शासन-प्रशासनासह राज्यभरातील जनतेचे लक्ष वेधलेल्या वाघोडावासीयांनी खा. रामदास तडस यांच्याशी सोमवारी झालेल्या सुसंवादानंतर आपली भूमिका मवाळ केली आहे. कर्जमाफीची फुंकर घालण्यापेक्षा वीज आणि पाणी देऊन कायमस्वरुपी तोडगा काढा, असा सूर यावेळी आवळला. खा. तडस यांनीही लगतच्या खैरी कार प्रकल्पाचे पाणी आणि आठ दिवसांत वीज पुरवठ्यासाठी आवश्यक कामे पूर्णत्वास नेण्याचा शब्द दिला.
वाघोडा येथे खा. रामदास तडस यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली. तब्बल तीन तास ही चर्चा चालली. खा. तडस यांनी गावकऱ्यांना मोकळ्या मनाने आपल्या भूमिका मांडण्याचा सल्ला देतानाच कर्जमुक्ती पाहिजे वा कायम स्वरुपी तोडगा निघाला पाहिजे, असा सवाल केला. तेव्हा गावकऱ्यांनी तात्पूरती कर्जमाफी देऊन जखमेवर फुंकर घालण्यापेक्षा लगतच्या खैरी कार प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळावे, तसेच शेतीतील कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्याची मागणी केली. या गोष्टींची पूर्तता झाल्यास गावातील शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, असा सूर गावकऱ्यांनी यावेळी काढला. तसेच शेतात टॉवर उभारले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपये देऊन बोळवण केली जात आहे. तेव्हा योग्य तो मोबदला मिळवून दिल्यास शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याचे समाधान होईल. तसेच वन्य जिवांचा त्रास थांबविण्यासाठी तारेचे कुंपण द्यावे, याकडेही गावकऱ्यांनी लक्ष वेधले. यावेळी खा. तडस गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले, येथील शेतीला खैरी कार प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न अल्पकाळात मार्गी लावणार असल्याचे सांगतानाच संबंधित अधिकाऱ्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन
४जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे. दोन दिवसात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. खा. रामदास तडस हे वाघोडा येथे जाण्यापूर्वी त्यांना शेतकरी आत्महत्येची वार्ता कळताच त्यांनी रुपचंद डोंहरे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
आजनगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाची पाहणी
४तत्पूर्वी खा. रामदास तडस यांनी आंजनगाव येथील जलयुक्त शिवार अभियानातील कामांचीही पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण मलसाने, तालुका कृषी अधिकारी महंत तसेच स्थानिक अधिकारी व गावकरी उपस्थित होते.