वितरिकांच्या सफाईवरुन सभा गाजली
By Admin | Updated: December 6, 2014 22:53 IST2014-12-06T22:53:49+5:302014-12-06T22:53:49+5:30
सेलू पंचायत समितीची आमसभा तब्बल चार वर्षांनी झाली. तब्बल चार तास रंगलेल्या या आमसभेत वर्धा व हिंगणघाट विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी विविध विभागाच्या

वितरिकांच्या सफाईवरुन सभा गाजली
सेलू, घोराड : सेलू पंचायत समितीची आमसभा तब्बल चार वर्षांनी झाली. तब्बल चार तास रंगलेल्या या आमसभेत वर्धा व हिंगणघाट विधानसभा मतदार संघाच्या आमदारांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नागरिकांनीही त्यांच्या भागात विकासाचे १२ वाजाल्याच्या प्रतिक्रीया दिल्या. तर कामाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनीही थेट शासनाची चूक असल्याचे म्हणत ‘चूक झाल्यास निलंबीत करा’ असे थेट उत्तर दिल्याने सारेच अवाक् झाले. इतर समस्यांच्या तुलनेत या आमसभेत वितरीकांच्या साफसफाईवरून चांगलीच गाजली.
पंचायत समितीच्या आवारात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार पंकज भोयर होते. प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार उपस्थित होते, तर अधिकारी वर्गात उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर, तहसीलदार संगीती राठोड, सभापती मंजुषा दुधबडे, उपसभापती मंजुषा पारसे, जि.प. सदस्य अरुण उरकांदे, निलिमा दंडारे यांची उपस्थिती होती.
तब्बल चार तास चाललेल्या आमसभेत मागील आमसभेचे इतिवृत्त वाचून कायम करायचे होते. पण अधिकाऱ्यांकडून व संबंधित विभागाकडून आलेले अनुपालन योग्य नसल्याने हा विषय बाजुला ठेवण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या, अशी वेळ आमसभेत पहिल्यांदाच आल्याची चर्चा येथे होती. नंतर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या समस्या ऐकण्यात आल्या. यावेळी सर्वाधिक प्रश्न पाटबंधारे विभागाच्या तक्रारीचे होते. ४० दिवसांपासून वितरिकांना पाणी सुरू असून शेवटच्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वितरिकांची साफसफाई व दुरूस्ती नसल्याने पाणी पोहचले नाही. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी निधी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत उत्तर दिले. मी प्रत्यक्षात तक्रारीचे निरसन करण्यासाठी वेळेवर साईडवर पोहचत आहे, जर माझी चुक असेल तर मला निलंबित करा, असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. यावर आ. कुणावार यांनी रबी हंगामाच्या तीन महिन्याअगोदर वितरीकांची साफसफाई करण्याचे निर्देश दिले.
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षकांकडून रुग्णांना सलोख्याची वागणूक मिळत नाही. शिवाय आवश्यक आरोग्य सेवा मिळत नसल्याचा मुद्दा सर्वांनीच उचलल्याने कारवाईची मागणीच करण्यात आली. अजूनही काही गावात स्मशानभूमी शेड व रस्ता नाही, तसेच चार वर्षांपासून मंजूर असलेली कामे झाले नसल्याचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. गावठाण जमिनीचे पट्टे देण्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचीही माहिती यावेळी उपस्थित नागरिकांनी दिली. यावर आमदारांनी हा प्रश्न तत्काळ मार्गी काढण्याच्या सूचना केल्या.
येळाकेळी व झडशी येथील कृषी सहायक सहा महिन्यापसून बेपत्ता असल्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. शिवाय पशु वैद्यकीय अधिकारी व वीज वितरण कंपनीत कनिष्ठ अभियंता नसल्याबाबतचा मुद्दा येळाकेळीच्या सरपंचानी उचलला. पशुवैद्यकीयय अधिकारी सुकळी (स्टे.) येथे गत काही महिन्यापासून सेवा देत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला. प्रास्ताविक कृषी अधिकारी एन.आर. किटे यांनी केले. संचालन शंकर घाफाट यांनी केले. उपस्थितांचे आभार गटशिक्षणाधिकारी संजय वानखेडे यांनी दिली. इतिवृत्त वाचन गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी केले. मंचावर तहसीलदार, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य उपस्थित होते. नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांवरून अधिकारी चांगलेच अडचणीत आले. शिवाय लोकप्रतिनिधी स्वत: उपस्थित असल्याने त्यांनी दिलेल्या सूचना पाळण्याची वेळही त्यांच्यावर आली. यामुळे समस्या सुटण्याची आशा बळावली.(वार्ताहर, तालुका प्रतिनिधी)