जिल्हा परिषदेत ‘महिलाराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 05:00 IST2020-01-07T05:00:00+5:302020-01-07T05:00:33+5:30
जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्य संख्या असून भाजपाकडे ३१ सदस्यांच बहूमत आहे. तर काँग्रेसकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, बहूजन समाज पार्टी व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन तर आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व ५२ ही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत ‘महिलाराज’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पुन्हा बहूमत कायम ठेवून सत्ता कायम राखली. त्यामुळे अध्यक्षपदी कारंजा तालुक्यातील कन्नमवारग्राम सर्कलच्या सरिता विजय गाखरे तर उपाध्यक्षपदी देवळी तालुक्यातील गुंजखेडा सर्कलच्या वैशाली जयंत येरावार या विजयी झाल्या. अध्यक्षपद नामाप्र महिलाकरिता राखीव होते; पण अध्यक्ष व उपाध्यक्षपदीही महिलांचीच वर्णी लागल्याने जिल्हा परिषदेत ‘महिलाराज’ आला आहे.
जिल्हा परिषदेमध्ये ५२ सदस्य संख्या असून भाजपाकडे ३१ सदस्यांच बहूमत आहे. तर काँग्रेसकडे १३, राष्ट्रवादी काँग्रेस, बहूजन समाज पार्टी व शिवसेनेकडे प्रत्येकी दोन तर आरपीआय आणि अपक्ष प्रत्येकी एक सदस्य आहे.आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्व ५२ ही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी भाजपकडून अध्यक्षपदाकरिता सरिता विजय गाखरे तर उपाध्यक्षपदाकरिता वैशाली जयंत येरावार यांनी तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन समाज पक्षाकडून अध्यक्षपदाकरिता तरोडा सर्कलच्या उज्ज्वला पांडुरंग देशमुख व उपाध्यक्षाकरिता सावंगी (मेघे) सर्कलचे उमेश गोपाळ जिंदे यांनी नामांकन दाखल केले होते. सभागृहात हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात भाजपच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना भाजपाचे ३१, आरपीआयचे १ तर शिवसेनेचे दोन अशी ३४ मते पडली. तर विरोधी पक्षाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमेदवारांना केवळ १८ मतांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे भाजपाच्या सरिता गाखरे यांची अध्यक्षपदी आणि वैशाली येरावार यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आले. निवडणुकीनंतर सभागृहातील सदस्यांनी टेबल वाजवून त्यांचे अभिनंदन केले. या निवडणूक प्रक्रियेत अध्यासी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यासह निवडणूूक विभागाचे मिलिंद जोशी, तहसीलदार प्रीती डुडुलकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव आदींची उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. शिवाय निकालानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.
अतिउत्साह; कार्यकर्त्यांकडून शांतता भंग
४आज निवडणुकीकरिता सर्व सदस्य सभागृहात दाखल झाल्यावर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. मिनिमंत्रालय असल्याने या परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे भान भाजपच्या काही अतिउत्साही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राहिले नाही. प्रक्रि या पूर्ण होण्यापूर्वीच वऱ्हाड्यात फटाके उडवायला सुरुवात केली. यावरच ते थांबले नाही तर ढोल-ताशाही सुरु केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आल्याने सूचनेवरून ढोल-ताशांचा आवाज बंद करण्यात आला. या फटक्यांमुळे मोठ्या प्रमाणात कचरा व धुरळा उडाला होता.
पहिल्यांदाच मान
४कारंजा तालुक्यात भोयर-पवार समाजाची संख्या मोठी आहे. सुरुवातीपासूनच आर्वी विधानसभा क्षेत्रातील कारंजा तालुक्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी होती. अखेर आमदार दादाराव केचे यांनी कारंजा तालुक्याची मागणी पूर्ण करण्यासाठी ताक द लावून भोयर-पवार समाजाच्या सरिता विजय गाखरे यांना अध्यक्षपदी विराजमान केले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच या समाजाला मान मिळाने जल्लोष केला.
विद्यमान पदाधिकाऱ्यांना सोपविला पदभार
नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीनंतर मावळते जि.प.अध्यक्ष नितीन मडावी यांनी विद्यमान अध्यक्ष सरिता गाखरे यांच्याकडे पदभार सोपविला. तर मावळत्या उपाध्यक्ष कांचन नांदूरकर यांनी विद्यमान उपाध्यक्ष वैशाली येरावार यांच्याकडे जबाबदारी सोपविली. यावेळी खा.रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ.समीर कुणावार, आ.दादाराव केचे, माजी खा. विजय मुडे, सुधीर दिवे, भाजपचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा अर्चना वानखेडे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, प्रशांत इंगळे तिगावकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्याम कार्लेकर यांची उपस्थिती होती.