Maharashtra Election 2019 ; भाजप सर्वसामान्यांचा विकास साधणारे सरकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:19+5:30
भाजप महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आष्टी (शहीद) येथील आठवडी बाजार चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ना. गडकरी बोलत होते. प्रचाराची त्यांच्या सभेने सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद ) : शहिदांच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. यात आष्टी तालुक्याचे ऐतिहासिक योगदान आहे. महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील स्वराज्य पूर्ण झाले; मात्र त्यांच्या नावाचा वापर करून सत्तेत राहिलेल्यांच्या चुकीच्या धोरणामुळे सुराज्य पूर्णत्वास गेले नाही. म्हणून खऱ्या सुराज्यासाठी भाजपलाच विजयी करा, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजप महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आष्टी (शहीद) येथील आठवडी बाजार चौकात जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी ना. गडकरी बोलत होते. प्रचाराची त्यांच्या सभेने सांगता झाली.
या सभेला दादाराव केचे, सुधीर दिवे, विजय बाजपेयी, माजी खासदार विजय मुडे, राहुल ठाकरे, संदीप काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, दिलीपराव काळे, उत्तमराव करांगळे, नीलेश देशमुख, अशोक विजयकर, कमलाकर निंभोरकर, मनीष ठोंबरे, प्रभाकर शिरभाते, जिल्हा परिषदच्या समाज कल्याण सभापती नीता गजाम, जिल्हा परिषद सदस्य अंकिता होले, अविनाश देव, प्रशांत सव्वालाखे, आवेश खान आदी मंचावर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. गडकरी म्हणाले, विकासाकरिता मनाचा निश्चय, काम करण्याची जिद्द आणि विकासाची दृष्टी असली पाहिजे, असे सांगत भाजप सरकारने पाच वर्षांत राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी सुधीर दिवे, माजी खासदार विजय मुडे, डॉ. श्याम भुतडा यांनीही सभेला संबोधित केले. सभेचे संचालन गजानन भोरे यांनी केले तर आभार मनीष ठोंबरे यांनी मांडले. सभेला आष्टी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.