सोयाबीनचे नुकसान, तर सरकीची होतेय डोबणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST2020-06-20T05:00:00+5:302020-06-20T05:00:36+5:30
पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी लावणी आणि पेरणीला प्रारंभ केला आहे. वघाळा शिवारात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन बुडाले तर पऱ्हाटीवर मोठ्या प्रमाणावर खंगा पडल्याने डोबण्याचे काम करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे चित्र चाणकी शिवारात आहे.

सोयाबीनचे नुकसान, तर सरकीची होतेय डोबणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : तीन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकी डोबण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून सोयाबीन हातचे गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व उद्योगधंदे ठप्प पडले. अनेकांचा रोजगार गेला. कृषी उद्योगाने मात्र जगविण्याचे काम केले. हे वास्तव असले तरी सरकार, प्रशासन शेतकऱ्यांच्या किती पाठीशी आहे, हे आता सांगण्याची गरज नाही. एकीकडे लावणी आणि पेरणीचा हंगाम सुरू आहे. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले नाही. तर कापूस विकण्यासाठी चक्क पावसाळ्यात धडपड करावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी लावणी आणि पेरणीला प्रारंभ केला आहे. वघाळा शिवारात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन बुडाले तर पऱ्हाटीवर मोठ्या प्रमाणावर खंगा पडल्याने डोबण्याचे काम करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे चित्र चाणकी शिवारात आहे.
तीन दिवस जोरदार पाऊस झाला. यात सरकीचे आठाने आणि सोयाबीनचे तर सर्वात जास्त नुकसान झाले.वीस एकरात पऱ्हाटी असून खंगे पडले. आता डोबणीचे काम सुरू आहे. घरात अद्याप ९० क्विंटल कापूस ठेवून आहे. नोंदणी झाली. हंगाम असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
- जगन्नाथ राऊत, चाणकी.
पावसाळा सुरू झाला.घरात अजूनही कापूस भरून आहे. नोंदणी झाली असून प्रथमच पावसाळ्यात कापूस विक्री पाहण्याचा प्रसंग आला आहे.या वर्षी केवळ सोयाबीन पेरले. आणि या पिकाचेही नुकसान झाले.
- श्रीकांत राऊत