हरभरा पिकावर घाटेअळीचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:07+5:30
उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरिपात अवकाळी पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन ओले झाल्याने अंकुरले. तर कापूसही भिजल्याने कवडीमोल भावात विकावा लागला.

हरभरा पिकावर घाटेअळीचा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ढगाळ वातावरण, अधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे जिल्ह्यातील शेतशिवारात हरभरा पिकावर घाटेअळ्यांनी हल्ला चढविला आहे. यामुळे उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
खरिपात अवकाळी पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन ओले झाल्याने अंकुरले. तर कापूसही भिजल्याने कवडीमोल भावात विकावा लागला. सोयाबीनचे दाणे ओले झाल्याने कित्येक शेतकऱ्यांना फारसा भाव मिळाला नाही. नैसर्गिक संकटांमुळे दरवर्षी दसऱ्याला घरात येणारा कापूस जिल्ह्यात अनेक ठिकाणी अद्याप शेतात आहे. त्यामुळे शेतशिवार शुभ्रच आहे. खरीप हंगामावर शेतकरी वार्षिक नियोजन करतो. मात्र, त्याचे हे नियोजन पूर्णत: कोलमडले. खरीप हंगाम शेतकºयांना लाभला नाही. शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चदेखील निघाला नाही. रब्बी हंगामावर शेतकऱ्याची भिस्त होती. या हंगामातील हरभरा पीक घाट्यांवर असताना ढगाळ वातावरणामुळे घाटेअळीने हल्ला चढविल्याने पिकांची अक्षरश: चाळण झाली आहे. महागड्या कीटकनाशकांची फवारणी करूनही अळ्यांचा प्रकोप कमी होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात लक्षणीय घट येणार असल्याने शेतकरी विवंचनेत आहेत. मात्र, कृषी विभागाकडून शेतकºयांना प्रभावी उपाययोजना सुचविल्या जात नाहीत. त्यामुळे शेकडो हेक्टरमधील हरभरा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसाने गहू पिकाचेही मोठे नुकसान झाले. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे पीक अक्षरश: जमिनीवर लोळले. खरीप हंगाम अवकाळी आणि परतीच्या पावसाने हातून गेला. या हंगामापाठोपाठ रब्बीतही पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हादरून गेला आहे. मुलांचे शिक्षण, लग्नसोहळे कसे करावे, या विवंचनेत जिल्ह्यातील शेतकरी आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करण्याकरिता कृषी विभागाला कळविले; मात्र शासकीय यंत्रणा शेतकºयांच्या बांधावर पोहोचली नाही. जिल्हाधिकाºयांनी नुकसानाचे सर्वेक्षण तातडीने करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
पावसामुळे खारही होतोय नष्ट
चीकणी शेतशिवारात यंदा मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाची लागवड करण्यात आली; मात्र वेळोवेळी अवकाळी पाऊस येत असून सातत्याने ढगाळी वातावरणाची छाया आहे. परिणामी पिकावर घाटी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच पावसामुळे हरभऱ्याच्या झाडांवरील खार नष्ट होत असल्याने घाटी भरत नाहीत. यामुळे हरभरा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याचा अंदाज येथील वयोवृद्ध शेतकरी वर्तवित आहेत.