जनतेचे लॉकडाऊन,अधिकाऱ्यांचे अप-डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:15+5:30
नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जनतेचे लॉकडाऊन,अधिकाऱ्यांचे अप-डाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संचारबंदीमध्ये वर्ध्यातून कोरोनाबाधित जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना अटकाव करण्यात आला आहे. मात्र, या बंदीतही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोनाबाधित जिल्ह्यात संचार सुरुच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीच आपल्या ओळखपत्राच्या किंवा प्रवासपासच्या आधारे नियमोल्लंघन करीत असल्याने ‘जनतेसाठी लॉकडाऊन व अधिकाऱ्यांचे अप-डाऊन’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.
कुणाचे लहान मुलं नागपूरात अडकले आहेत. कुणाच्या म्हाताऱ्या आईला यवतमाळातून वर्ध्याला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आणायचे आहे तर कुणी आपल्या सासुरवाडीत अमरावतीला अडकून पडले आहे. नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषत: शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्या असल्याने शुक्रवारीच जिल्ह्यातील काही विभाग विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी आपल्या यवतमाळ, अमरावती व नागपूर येथील स्वगृही गेले आहेत. एकीकडे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व वाहने तपासली जात असल्याचे सांगितले जात असतानाच ये-जा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची यातून कसे सुटतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे.
... तर आज तपासणी नाक्यावर उलगडणार सत्य
शासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता यवतमाळ, अमरावती व नागपूर येथून आवागमन करत आहे. यात नागपुरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाकारली जात आहे. पण, सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी अमरावती, यवतमाळ व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या सीमांवर सकाळपासून तपासणी केली तर अपडाऊन करणाऱ्यांचे सत्य बाहेर आल्या शिवाय राहणार नाही. पण, प्रशासन हे करणार का? हा मुळ प्रश्न आहे.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. कुणालाही ये-जा करण्याकरिता प्रवास पास दिलेली नाही. मुख्यालयी न राहता ते अपडाऊन करतात, या संदर्भात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. यासंदर्भात संबंधितांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाईल.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी
जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर कुणालाही ये-जा करण्यासाठी परवानगी नाही.
- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक