शेतीच्या मशागतीला मजूरच मिळेना
By Admin | Updated: June 21, 2014 02:01 IST2014-06-21T02:01:01+5:302014-06-21T02:01:01+5:30
गतवर्षी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला. मात्र यंदा वर्षाच्या सुरूवातीला अनियमित पाऊस ...

शेतीच्या मशागतीला मजूरच मिळेना
सेलू : गतवर्षी शेतकऱ्यांनी निसर्गाच्या प्रकोपाचा सामना केला. मात्र यंदा वर्षाच्या सुरूवातीला अनियमित पाऊस आणि प्रलंबित पावसामुळे शेतकरी त्रस्त आहे. यातच मजुरीचे दर वाढल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. याशिवाय मजूर मिळत नसल्याने मशगतीचे कामे खोळंबली आहे.
मागील हंगाम पिकांकरिता प्रतिकुल असल्याने शेतकऱ्याच्या अपेक्षा रब्बी हंगामावर होत्या. परंतु, रब्बी हंगामातील पीक बरहल्यावर नेमकी गारपीट झाली. तोंडाचा घास हिरावला. पुन्हा एकदा नव्या उमेदीने शेतकरी खरिपाच्या मशागतीला लागला. मात्र मजूरच्या मिळत नसल्याने आगामी शेतीची कामे कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मजूरीचे दर वाढल्याने किंबहुना ती रक्कमही शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नाही. त्यामुळे घरातील सर्व मुलाबाळासह आपल्या शेतीवर सकाळपासून शेतकरी राबताना दिसून येत आहे. मजुरांच्या मजूरीच्या दरात सध्या मोठी वाढ झाली आहे. १५० ते ३०० रूपये मजूरीचा दर आहे. यामुळे शेकतकरी त्रस्त आहे. वाढलेली मजूरी देऊनही मजूर मिळतीलच याची खात्री नाही. परिणामी, सध्या खरीपाच्या लागवडीसाठी सुरू असलेल्या शेती मशागतीच्या कामावर परिणाम होत आहे. आधीच विविध नैसर्गिक प्रकोपामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नसताना खरीपाची तयारी कशी करावी हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
शासनाच्या अंत्योदय व दारिद्रयरेषेखालील घटकांसाठीच्या स्वस्त धान्य योजनेमुळे एका कुटुंबाला महिन्यासाठी ३५ ते ४४ किलो धान्य स्वस्तात मिळत आहे. अतिशय कमी किमतीत धान्य मिळत असल्याने मजूरांनी धान्यासाठी मजुरीच करणे सोडून दिले. परिणामी उत्पन्न कमी व खर्च अधिक झाल्याने शेतकऱ्यांनी गहू व इतर कडधान्यांचा पेरा कमी केला. त्याऐवजी सोयाबीन व हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही दोन्ही पिके अल्प कालावधीत येतात आणि इतर पिकाच्या तुलनेत कमी मजूर लागतात. निंदणाला पर्याय म्हणून तणनाशकाचा वापर करीत आहे. मात्र याच्या अतिरेकी वापरचा परिणाम थेट जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ मजूर मिळत नसल्याने दुष्परिणामाची माहिती असूनही शेतकऱ्यांकडून तणनाशकाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. आज निर्माण झालेल्या वैरणटंचाईमागे मजुरांची समस्याच कारणीभूत आहे. ज्वारीचा पेरा कमी झाला तेव्हापासून वैरणटंचाई निर्माण झाली. गुरे चारण्यासाठी गुराखी मिळत नसल्याने गुरांची संख्या कमी झाली आहे. शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करीत असल्याचे दिसून येते.(तालुका प्रतिनिधी)