जिल्ह्यात ३ लाख ११ हजार हेक्टरवर खरिपातील पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:02+5:30
जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता.

जिल्ह्यात ३ लाख ११ हजार हेक्टरवर खरिपातील पेरणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात रोहिणी आणि मृग नक्षत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तब्बल ३ लाख ११ हजार ८६५ हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. यंदाच्या हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन होते, सरासरी एकूण ७०.४३ टक्के पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षकांनी दिली.
जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता. जवळ पै-पैसा नसताना उसनवारी आणि पीककर्ज काढून कपाशी, तूर, सोयाबीन आदीची शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, २०-२२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोवळ्या रोपांनी उष्णतामानामुळे माना टाकल्याचे चित्र आहे. तर पेरणीनंतर जिल्ह्यात अनेक भागात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी कसेबसे पीक जगविले. मात्र, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत पावसाअभावी भर पडली आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७०.४३ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. पावसाने दडी मारल्याने सर्वच शेतकºयांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे लावे लागेल, अशी सद्यस्थिती आहे.
पावसाच्या दडीने वाढविली शेतकऱ्यांची चिंता
रोहिणी आणि मृग नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, मागील २० ते २२ दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहेत.
जुलै महिना उजाडूनही पावसाचा पत्ता नसून प्रखर ऊन आणि वातावरणात कमालीचा उकाडा आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास तिबार पेरणी करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत.