मुलीमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण ठरतेय चिंतेची बाब
By Admin | Updated: June 19, 2014 00:12 IST2014-06-19T00:12:33+5:302014-06-19T00:12:33+5:30
देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर

मुलीमध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण ठरतेय चिंतेची बाब
पिंपळखुटा : देशात किशोरवयीन मुलामुलींची संख्या देशातील एकूण लोकसंख्येच्या २३ टक्के आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये असलेल्या रक्तक्षयाचे प्रमाण ५२ टक्के असल्याची बाब समोर आली आहे. ही बाब चिंतेची असून भावी पिढी अधिक सुदृढ असण्याकरिता आरोग्य प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
यासोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे हा परिणाम असल्याचे या अहवालात म्हटले आहे. मुले आणि मुली लवकरच वयात येत असल्याने त्यांना लैंगिक शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे़ या दृष्टीकोनातून शासनाच्या वतीने राज्यात किशोर किशोरीसाठी राबविण्यात येणाऱ्या संवाद आणि सेवा या केंद्राचे नाव बदलून ते आता राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम असे करण्यात आले आहे़
शासनाच्यावतीने हा कार्यक्रम राज्यात नऊ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे़ १० ते १९ या वयोगटातील मुलामुलींची शारीरिक, लैंगिक आणि बौद्धिक वाढ होत असते़ मुलीमध्ये मासिक पाळी सुरू होते़ त्यामुळे या दोन्ही गटात भावनिक, मानसिक, वैचारिक बदल होत असतात़ यावेळी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. त्यासाठी पालक, शिक्षक किंवा नातेवाईक मोकळेपणाने त्यांना माहिती देवू शकत नाही़ अर्थातच त्यामुळे या वयात मुलामुलींमध्ये परस्परांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होते़
अनेकवेळा लैंगिक बाबतीत गैरसमजही निर्माण होतात़ त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होते़ शासनाकडून होत असलेले प्रयत्न पुरेसे नसल्याने या समस्यात वाढ होताना दिसून येत आहे.
शासनाने राज्यभरात किशोरवयीन मुलामुलींना समुपदेशन करण्यासाठी सुमारे १५० मैत्री क्लिनीक केंद्राची स्थापना केली आहे़ या केंद्रात मुलामुलींना मार्गदर्शन करण्यात येते़ तेथे त्यांच्याबद्दल नोंदविण्यात आलेल्या माहितीची गोपनियता ठेवण्यात येते़
आहार, विवाह, गरोदरपन, गर्भपात, प्रजनन संस्थेचे आजार, व्यसनमुक्ती याबाबत सल्ला आणि उपचाराकरिता परिचारिका, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आणि जज्ज्ञ उपलब्ध असतात़ यासह किशोरवयीन मुलींना आहाराविषयक योग्य माहिती देऊन रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न गरजेचे असल्याचेही यावेळी मान्यवरांनी सांगितले़(वार्ताहर)