बाजार समित्यांच्या निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागणार
By Admin | Updated: June 27, 2015 02:42 IST2015-06-27T02:42:03+5:302015-06-27T02:42:03+5:30
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, आष्टी-कारंजा, सेलू, देवळी-पुलगाव या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे.

बाजार समित्यांच्या निवडणुकीत नेतृत्वाचा कस लागणार
बिगूल वाजला : भाजपची प्रतिष्ठेची तर काँग्रेस-राकाँसाठी अस्तित्वाची लढाई
राजेश भोजेकर वर्धा
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, आष्टी-कारंजा, सेलू, देवळी-पुलगाव या पाच बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. येत्या दोन वर्षांत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी रणनिती आखली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय नेत्यांनी पडद्यामागील सूत्रे हातात घेतली आहे. यामध्ये कोण वरचढ ठरतो. यावर जिल्ह्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरणार असून जनतेचे लक्ष लागले आहेत.
या पाचही उत्पन्न बाजार समित्यांच्या प्रत्येकी १८ जागांसाठी होण्याऱ्या निवडणुकीसाठी कुठे उमेदारांची निश्चिती झाली आहे, तर कुठे नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकाच दिवशी मतदान होणार नसल्यामुळे नेत्यांना एकेका बाजार समितीच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करता येणे शक्य होणार आहे. यामुळे या निवडणुकीची चुरस आणखीनच वाढली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच बाजार समित्या मागील २५ ते २० वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाने उडी घेतल्यामुळे निवडणुकीला नवा रंग चढला आहे.