निलंबित कृषी सहायकांना कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:17+5:30
आर्वी उपविभागातील तीन कृषी सहाय्यकांना कुठलीही पूर्व सूचना न देता थेट निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे कृषी सहाय्यकांमध्ये रोष वाढत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात मानसिक दडपन त्यांच्यावर आले आहे. इतकेच नव्हे तर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांच्या मनमर्जी कामावर पांघरुण घालण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसचालक रविंद्र भोसले यांनी कामात हयगय करीत असल्याचा ठपका ठेऊन तब्बल तीन कृषी सहाय्यकांवर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असून निलंबनाची कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्यावतीने गुरूवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सदर मागणीवर येत्या काही दिवसात सहानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास १७ फेबु्रवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आर्वी उपविभागातील तीन कृषी सहाय्यकांना कुठलीही पूर्व सूचना न देता थेट निलंबीत करण्यात आले आहे. यामुळे कृषी सहाय्यकांमध्ये रोष वाढत आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात मानसिक दडपन त्यांच्यावर आले आहे. इतकेच नव्हे तर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी यांच्या मनमर्जी कामावर पांघरुण घालण्यासाठी करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी पूर्व सूचना तसेच कारणे दाखवा नोटीस बजावणे क्रमप्राप्त आहे. परंतु, तसे न करण्यात आल्याचे या कारवाई बाबत संभ्रम निर्माण होत आहे.
कुठल्या तरी दबावात येऊन करण्यात आलेली ही कारवाई तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. धरणे आंदोलनात संजय ठाकरे, रितेश करोडे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भोयर, जांबुवंत मडावी, प्रज्ञा पाटील, मोईन शेख, रंजना वानखेडे, विशाल बीरे, समीर खोंडे, राहूल घुबे, संतोष पाटील, मनोज पांडे, हर्षल चौधरी, राम बावनकर यांच्यासह जिल्ह्यातील सुमारे १५० कृषी सहाय्यक सहभागी झाले आहेत.