आधी पोलिसांना हेल्मेटसक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 23:55 IST2018-04-01T23:55:29+5:302018-04-01T23:55:29+5:30
लोकसहभागातून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीसाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत सुमारे २० विविध सामाजिक संस्था व संघटनांनी हेल्मेटसक्तीला संमती दर्शविली.

आधी पोलिसांना हेल्मेटसक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसहभागातून जिल्ह्यात हेल्मेटसक्तीसाठी वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत सुमारे २० विविध सामाजिक संस्था व संघटनांनी हेल्मेटसक्तीला संमती दर्शविली. हेल्मेटसक्तीचा पहिला टप्पा रविवार १ एप्रिलपासून राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
वाहनचालविताना प्रत्येक दुचाकी चालकाने हेल्मेटचा वापर करावा असे क्रमप्राप्त आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी नजीकच्या नागपूर जिल्ह्यात होत असल्याचे दिसते. इतर जिल्ह्याप्रमाणे नियमांवर बोट ठेवून वर्धेत हेल्मेटसक्ती करण्यापेक्षा हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना पटवून देत लोकसहभागातून हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
शिवाय त्या दिशेने वाटचालही सुरू आहे. हेल्मेटसक्तीच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना दुचाकी वाहनचालविताना रविवार १ एप्रिलपासून हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जो पोलीस अधिकारी व कर्मचारी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर न करताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
दोन महिन्यांमध्ये रस्ता अपघातात ३६ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सन २०१६ मध्ये ५६५ रस्ता अपघात झाले. यात २६७ जण गंभीर जखमी झाले तर १७९ जणांचा मृत्यू झाला. सन २०१७ मध्ये ५०३ अपघात झाले. यात २९६ जण गंभीर जखमी झाले तर १६९ जणांचा मृत्यू झाला. तर २०१८ च्या फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात ९६ अपघातांची नोंद घेण्यात आली आहे. यात ५२ जण गंभीर जखमी झाले असून तब्बल ३६ जणांचा मृत्यू झाला. ज्यांचा अपघातात मृत्यू झाला त्यापैकी कुणी दुचाकीचालक हेल्मेट घालून असता तर कदाचीत त्याचे प्राण वाचले असते, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
हेल्मेट वाचवू शकते प्राण
वाहन चालविताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट किती फायद्याचे आहे, हे अनेकांना ठाऊक असताना त्याच्या वापराकडे दुर्लक्षच केले जाते. अपघात प्रसंगी बहूदा हेल्मेट एखाद्याचे प्राण वाचविण्यास फायद्याचे ठरू शकत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर गरजेचा आहे.
हेल्मेट न वापरल्यास ५०० रुपये दंड
रविवार १ एप्रिलपासून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने हेल्मेटसक्तीचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. जो पोलीस अधिकारी व कर्मचारी हेल्मेटचा वापर न करताना आढळून येईल याला वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा ५०० रुपयांचा दंड ठोठावून त्याची वसूली करणार आहे. इतकेच नव्हे तर पहिल्या टप्प्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाच्या माध्यमातून पाळत ठेवली जाणार आहे.
रविवार १ एप्रिलपासून हेल्मेटसक्तीचा पहिला टप्पा राबविण्यात येत आहे. यात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. दुसºया टप्प्यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नागरिकांवरही हेल्मेटची सक्ती करण्यात येणार आहे.
- दत्तात्रय गुरव, उपनिरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा.