स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात

By Admin | Updated: December 10, 2014 23:02 IST2014-12-10T23:02:36+5:302014-12-10T23:02:36+5:30

देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली

Health hazard due to lack of cleanliness | स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात

स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात

वायगाव (नि़) : देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे़ शासकीय कर्मचाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थीही यात सहभागी होत आहे़ अनेक ग्रामपंचयतींनीही स्वच्छता अभियान राबविले; पण गावात स्वच्छतेला बगल दिली जात असल्याचेच दिसते़ यामुळेच गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
स्थानिक वॉर्ड क्रमांक ६ मधील हनुमान देवस्थानाजवळ अस्वच्छतेचा कळस आहे़ आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रा़पं़ प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याने घाणीच्या साम्राज्यात वाढ होत आहे़ यामुळे साथीच्या आजाराचा प्रकोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ साथीच्या आजाराचा उद्रेक झाल्यानंतर वॉर्डात स्वच्छता करण्यात येणार काय, असा प्रश्न नागरिकांद्वारे उपस्थित केला जात आहे़ सध्या वॉर्ड क्ऱ ६ मध्ये नाल्या तुंबल्या असून नालीतील सांडपाणी व किडे परिसरातील घरांमध्ये शिरत असल्याचे दिसते़
गावात अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरलेली आहे़ रस्त्यावर साचलेला कचरा आणि नालीतील सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना तोंडाला रूमाल लावूनच ये-जा करावी लागते़ कित्येक दिवसांपासून नाल्या न उपसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे़ विशेषत: वॉर्ड क्रमांक ६ हा सरपंचाचा आहे़ या परिसरापासून काही अंतरावर सरपंचाचे घर असताना अस्वच्छता पसरल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत़ नालीतील सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे़ काही नागरिकांच्या स्वयंपाक घरात नालीतील किडे आढळून आल्याने गावात असंतोष पसरला आहे़ याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या; पण ग्रामपंचायत प्रशासन याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते़ यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रा़पं़ प्रशासनास सादर केले असून निवेदनाच्या प्रती मंत्र्यांनाही पाठविल्या आहेत़
गावात स्वच्छता अभियान राबविण्यात यावे, तसेच नाल्यांची सफाई करून नाल्या वाहत्या करण्यात याव्या अशी मागणी प्रमोद, हरणे, सुरेश ढोले, मोहन वांदाडे, उल्हासराव तलमले, शालिक वरघणे, सुधाकर चांभारे, गणेश देवतळे यांच्यासह नागरिकांनी निवेदनातून केली आहे़(वार्ताहर)

Web Title: Health hazard due to lack of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.