पुतळा वादाला अंतर्गत गटबाजीची किनार
By Admin | Updated: July 21, 2015 02:52 IST2015-07-21T02:52:31+5:302015-07-21T02:52:31+5:30
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण जागेच्या आकाराबाबत आंबेडकरी समाजाच्या दोन गटातील मतभेद

पुतळा वादाला अंतर्गत गटबाजीची किनार
देवळी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण जागेच्या आकाराबाबत आंबेडकरी समाजाच्या दोन गटातील मतभेद चव्हाट्यावर आले. यामुळे गोंधळ सदृश्यस्थिती निर्माण झाली. नगराध्यक्ष शोभा तडस, पोलीस उपअधीक्षक राजन पाली व पोलीस निरीक्षक साखरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजाच्या एका गटासोबत जागेबाबतचा तोडगा काढण्यात आला; परंतु याच दरम्यान दुसऱ्या गटाच्या महिलांनी या वादग्रस्त जागेवर धडक देत येथील खड्डे बुजविल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.
या वादाबाबत स्थानिक न.प. प्रशासन व आंबेडकर स्मारक समितीच्या एका गटाने संयुक्त पत्रक प्रसिद्ध करून भूमिका विषद केली. पुतळा सौंदर्यीकरणाच्या मुद्याबाबत स्थानिक न.प.मध्ये आंबेडकरी समाजाच्या एका गटासोबत शुक्रवारी बैठक झाली.
यामध्ये सौंदर्यीकरणासाठी ८ हजार १२५ चौ. फुट जागा देण्यासोबत १० लाखचा शासकीय निधी तसेच पुतळ्याच्या बाजूला प्रसाधनगृह राहणार नसल्याच्या अटीवर समेट घडूवन आणण्यात आला. त्यानुसार जागेच्या आखणीचे खड्डे खोदत असताना माजी नगराध्यक्ष गौतम पोपटकर यांच्या गटाने घटनास्थळी येवून व्यत्यय निर्माण केला. यामुळे त्यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण करण्यात आल्याचा आरोप एका प्रसिद्ध पत्रकातून करण्यात आला.
जागेच्या आकाराचा मुद्दा प्रतिष्ठेचा न बनविता गावात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी सामंजस्याने हा प्रश्न निकाली निघावा, अशी अपेक्षा प्रसिद्ध पत्रकातून नगराध्यक्ष शोभा तडस, उपाध्यक्ष विजय गोमासे व न.प. सदस्य राजेश बकाने यांनी केली.
न.प. सोबत झालेल्या समेट बैठकीत आंबेडकरी समाजाच्या एका गटाच्या वतीने माजी नगरसेवक रितेश लोखंडे, नम्रता कोल्हटकर, माजी पं.स. उपसभापती मारोती लोहवे, दिनेश भगत, भीमजय म्हैसकार व इतरांचा समावेश होता. बाबासाहेबांच्या नावावर दिशाभूल करून सौंदर्यीकरणाच्या मुद्यात वेगळे वळण मिळू नये. समाजाने कणखर भूमिका न घेता जातीय सलोखा निर्माण करावा, अशी विनंती समाजाच्यावतीने कोल्हटकर व लोहवे यांनी केली. (प्रतिनिधी)
४पुतळा सौंदर्यीकरणासाठी ८ हजार १२५ चौ. फूट जागा देण्यासोबत १० लाखांचा शासकीय निधी तसेच पुतळ्याच्या बाजूला प्रसाधनगृह राहणार नसल्याच्या अटीवर समेट घडूवन आणण्यात आला. मात्र दोन गट समोरासमोर आल्याने वाद निर्माण झाला.