अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणासाठी मोठा वाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:10+5:30
अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणाकरिता येथे मोठा वाव असून यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली तर देशभरातील शिक्षक, अनुवादक आणि विद्यार्थी येथे येतील. राजभाषा हिंदी करिता केंद्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विश्व विद्यालयाला मान्यता देण्याच्या दिशेने योग्य पाऊले उचलण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतीचे सचिव संजय कोठारी यांनी केले.

अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणासाठी मोठा वाव
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विश्वविद्यालयात गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर विदेशी आणि भारतातील अधिकाऱ्यांकरिता अभ्यासक्रम तयार केला पाहिजे, जेणेकरून गांधीजींचे ग्राम स्वावलंबन आणि स्वयंपूर्ण खेडी असे विचार प्रसारित केले जातील. अनुवाद आणि भाषा प्रशिक्षणाकरिता येथे मोठा वाव असून यासाठी प्रशिक्षण योजना तयार केली तर देशभरातील शिक्षक, अनुवादक आणि विद्यार्थी येथे येतील. राजभाषा हिंदी करिता केंद्रीय प्रशिक्षण संस्था म्हणून विश्व विद्यालयाला मान्यता देण्याच्या दिशेने योग्य पाऊले उचलण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपतीचे सचिव संजय कोठारी यांनी केले.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाला त्यांनी रविवारी भेट दिली. यावेळी विद्यार्थी व प्राध्यापकांशी संवाद साधताना ते बोलत होते.
प्रो. रजनीशकुमार शुक्ल यांनी कोठारी यांचे चरखा, पुष्पगुच्छ, विश्वविद्यालयाची पुस्तके, सूतमाळा प्रदान करुन स्वागत केले. विश्वविद्यालयात त्यांनी गांधी हिलवर गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्याथ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता आणि सुविधांवर प्रश्न विचारले. कोठारीे म्हणाले, राष्ट्रपतीजींच्या अधीन देशभरातील १५० केंद्रीय विद्यापीठे आणि संस्था येतात. त्यांचे सामान्य अवलोकन करण्यासाठी वर्धा विश्वविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये नावीन्यपूर्ण काय करता येईल हे पाहण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांची स्पष्ट केले. हिंदी विश्व विद्यालयापासून त्याचा प्रारंभ होत आहे असेही ते म्हणाले. १९७८ बॅचचे व हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले कोठारी यांनी विविध सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम याविषयी विस्ताराने चर्चा केली. विश्वविद्यालयांनी माजी विद्यार्थी संघ बळकट करून त्यांचा लाभ करून घ्यावा व त्यांना आपणही काही देणे लागतो याविषयी प्रेरित करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी समस्या व सुविधा याविषयी विचारलेल्या प्रश्नांविषयी थेट संवाद साधला. कुलगुरू प्रो. रजनीश कुमार शुक्ल, प्र-कुलगुरू प्रो. चंद्र्रकांत रागीट, प्रो. हनुमान प्रसाद शुक्ल, प्रो. मनोज कुमार, कुलसचिव कादर नवाज खान यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रो. अवधेशकुमार यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रकुलगुरु प्रो. हनुमानप्रसाद शुक्ल यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी उन्नत भारत अभियाना अंतर्गत नांदोरा, गणेशपूर, सोनेगाव बाई, तळेगाव टालाटुले आणि तामसवाडा येथील नागरिक आणि शेतकरी यांच्याशीही चर्चा केली. स्वच्छ भारत अभियान, महिला सक्षमीकरण, ग्राम स्वावलंबन, आरोग्य सोयी, महिला बचत समूह याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. उन्नत भारत अभियानाअंतर्गत या गावांमध्ये विश्वविद्यालय काम करीत आहे. त्यांनी स्वामी सहजानंद सरस्वती संग्रहालयाचेही निरीक्षण केले. त्यांनी सेवाग्राम आणि पवनार आश्रमाला भेट देऊन तेथील महात्म्य जाणून घेतले. बापू कुटीमध्ये सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानाचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू आणि पवनार आश्रमात गौतम बजाज यांनी त्यांना आश्रमांविषयी माहिती दिली. कोठारी यांच्यासमवेत त्यांची पत्नी व मुलगीही होत्या.