स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:14+5:30
जिल्हा क्रीडा संकुल येथे लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुरुमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे होते.

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन महत्त्वाचे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्पर्धा म्हटले की हार, जीत असणारच. स्पर्धेत जिंकणे महत्त्वाचे नसून खेळाडूंनी त्यांच्यातील उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करणे अधिक महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपल्या जिल्ह्याचे नाव करावे. आयोजकांनी हरणाऱ्या खेळाडूलासुद्धा प्रशस्तीपत्र देऊन खेळाचा आणि खेळाडूचा सन्मान करावा, असे विचार जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश दिलीप मुरुमकर यांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुरुमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे होते. उपवनसंरक्षक सुनील शर्मा, जिल्हा कोषागार अधिकारी सूरज बारापात्रे, सदाशिव शेळके, संदीप ओव्हाळ, कोठे, अशोक मातकर, मनोज गोस्वामी, अभिजित मेंगडे, अंडस्कर, मसराम, कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मुरूमकर यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगितले. खेळाडूंनी या स्पर्धेत मनसोक्त खेळण्याचा आनंद घ्यावा आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव घालवावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रशासनात काम करताना अनेकदा ताण-तणावात कर्मचारी काम करतात. मानसिक आणि शारीरिक थकवा घालविण्यासाठी अशा क्रीडा महोत्सवाचे आयोजन उपयुक्त ठरते. स्पर्धेत खेळाडूंनी खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन करून स्पर्धेत यश मिळवावे, असे प्रतिपादन लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे यांनी केले. दैनंदिन काम करताना अनेकदा आपापसात झालेले हेवेदावे अशा प्रकारच्या सांघिक आयोजनांमध्ये दूर होतात. जिंकण्याच्या उद्देशाने सर्व कर्मचारी एक टीम म्हणून एकत्र खेळते. असेच टीमवर्क दैनंदिन कामातही ठेवल्यास काम वेळेत पूर्ण करता येते आणि ताणसुद्धा येत नाही. अशीच सांघिक भावना खेळाडूंनी कायम ठेवावी, असे आवाहन कोल्हे यांनी याप्रसंगी केले. उपवनसंरक्षक सुनील शर्मा म्हणाले, आपण कार्यालयात काम करताना बुद्धीचा उपयोग करतो. अशा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे शारीरिक क्षमतेचा उपयोग करता येतो. त्यामुळे आपल्याला जीवनाचा खरा आनंद घेता येतो. कार्यक्रमाला जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन दीपक धाबर्डे व अजय गजभिये यांनी केले. तर आभार सूरज बारापात्रे यांनी मानले.