खासगीसह शासकीय कार्य गांधी विचारातून व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 05:00 AM2020-01-28T05:00:00+5:302020-01-28T05:00:11+5:30
खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी यांनी ग्रामोद्योग व ग्रामविकास यावर विशेष लक्ष दिले. गांधीजींच्या स्वप्नातील भारत म्हणजे ग्राम होय; पण सध्या आपल्याला ग्रामोद्योग व ग्रामविकास घडवून आणायचा असेल तर खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी व्यक्त केले.
पी. वी. राजगोपाल यांच्या नेतृत्वात गांधी संदेश घेवून येथे आलेल्या ‘जय जगत’ विश्व शांती पदयात्रेचे स्वागत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या पदयात्रेच्या माध्यमातून बापूंच्या शांती, सद्भावना व बंधुभाव हे सूत्र संपूर्ण जगात पोहोचविले जात आहे. राजघाट दिल्ली ते सेवाग्राम पदयात्रेचा एक टप्पा म्हणून ही पदयात्रा वर्धेतील अग्निहोत्री कॉलेज परिसरात शनिवारी सायंकाळी उशीरा पोहचली. तेथे रविवारी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी येऊन पी. वी. राजगोपाल यांच्यासह सर्व यात्रेकरूंचे स्वागत केले. याप्रसंगी शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनीही मनोगत व्यक्त केले. गांधी सिद्धांतामध्ये विचार, आचार व प्रचार हे मुळ आहे. विचारासोबत आचरण असले पाहिजे आणि या आचरणातून आपण प्रचार केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी १५ आंतरराष्ट्रीय पदचारींसह सुमारे १०० सत्याग्रही व जय महाकाली शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद गिरडकर, अरुण वसू, दत्तात्रय कानस्कर आदी उपस्थित होते.
यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण - पी. वी. राजगोपाल
जय जगत पदयात्रेचा बापूंच्या भूमीत २००० कि.मी. अंतराचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. या यात्रेदरम्यान विविध विषयांवर ठिकठिकाणी चर्चा झाली. येत्या गांधी पुण्यतिथीपर्यंत नॉन व्हायलेंट एकॉनोमी व नॉन व्हायलेंट गर्व्हनन्स या दोन मुद्द्यांवर महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा व सेवाग्राम आश्रम येथे विविध तज्ञांसोबत चर्चा होणार असल्याचे याप्रसंगी पी. वी. राजगोपाल यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.