तूर उत्पादकांना शासनाचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 22:12 IST2018-02-08T22:12:29+5:302018-02-08T22:12:45+5:30

तुरीचा पेरा करताना बहुतांश शेतकरी कपाशीच्या दोन ओळी नंतर एक ओळ या पद्धतीने लागवड करतात. यामुळे पेरेपत्रकावर तुरीचा उल्लेख करताना टक्केवारीच्या स्वरूपात केला जातो.

 Government relief to tur growers | तूर उत्पादकांना शासनाचा दिलासा

तूर उत्पादकांना शासनाचा दिलासा

ठळक मुद्देउत्पादन क्षेत्राची मर्यादा हटली : खरेदीदरम्यान होणार एकराचा उल्लेख; खरेदी करतानाचीही अडचण दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तुरीचा पेरा करताना बहुतांश शेतकरी कपाशीच्या दोन ओळी नंतर एक ओळ या पद्धतीने लागवड करतात. यामुळे पेरेपत्रकावर तुरीचा उल्लेख करताना टक्केवारीच्या स्वरूपात केला जातो. यात विक्रीकरिता बाजारात आल्यानंतर उत्पादनाच्या वजनावरून त्याची विक्री करताना अनेक अडचणी निर्माण होतात. ही अडचण आता दूर झाली असून तुरीचा उल्लेख एकराच्या हिशेबाने होणार असल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पणन मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे केवळ शेतकरीच नाही तर खरेदी करणाऱ्या यंत्रणेचीही अडचण दूर झाली आहे. खरेदी करताना पेरीपत्रकावरील उल्लेखानुसार शेतकऱ्याचे उतपादन कमी अधिक होत होते. यात कमी उत्पादन झाल्यास अडचण येत नव्हती; मात्र अधिक उत्पादन झाल्यास खरेदी दरम्यान अडचणी येत होत्या. आता नव्या निर्णयानुसार या अडचणी दूर झाल्या असून त्याचा लाभ शेतकºयांसह खरेदी करणाऱ्या शासकीय यंत्रणेलाही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या अटीमुळे जिल्ह्यात झालेले संपूर्ण उत्पादन खरेदी करण्याकरिता शासनाच्यावतीने प्रयत्न राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ग्रेडरची समस्या मार्गी लागली असून जिल्ह्यातील सातही केंद्रावर लवकरच खरेदी सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
ग्रेडरची समस्या मार्गी; पण धोका कायम
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत ग्रेडरच्या अनुपस्थितीत खरेदी सुरू होती. खरेदी नंतर पत्रावर ग्रेडरची स्वाक्षरी करून ती तूर समोर पाठविल्या जाणार होती. तुर्तास ही समस्या मार्गी लागली आहे. सातही केंद्रात ग्रेडर आले आहे. आलेले ग्रेडर हे नाफेडचे नसून मार्केटींग फेडरेशनचे आहेत. त्यांनी पास केलेली तूर वखार महामंडळात नाफेडच्या ग्रेडरकरून तपासण्यात येणार आहे. येथे जर या तुरीत गडबड असल्यास ती परत येण्याचा धोका कायम आहे.
आर्वीत नाफेडला मिळाली पाच दिवसात १२ क्विंटल तूर
आर्वी- नाफेडच्यावतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदी सुरू केली आहे. यातील पाच केंद्र सुरू झाले आहे. या पाच केंद्रात आर्वीचे केंद्र असून या केंद्रावर पाच दिवसात केवळ १२ क्विंटल तूर आल्याचे दिसून आले आहे. याला नाफेडच्यावतीने खरेदी दरम्यान लादलेल्या जाचक अटी एक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आॅन लाईन पध्दतीने तूर विक्रीची नोंदणी केली आहे. असे खरेदी विक्री संघातर्फे दररोज फक्त १० शेतकऱ्यांना तुरीचे नमुने आणण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. १०० ग्राम तुरी मोजुन त्यामधून तुरीचा ओलावा १२ टक्के, खराब दाणे ३ टक्के, फुटलेली तूर ३ टक्के असे प्रमाण असल्यासच तुरीची खरेदी करण्यात येते. खरेदीच्या वेळी चाळणी सुध्दा मारण्यात येते. यावर्षी तुरीच्या पिकावर व्हायरस आल्याने तूर भरली नाही. त्यामुळे शेगां अर्धवटच भरल्या. परिणामी तुरीच्या पिकात प्रचंड घट झाली आहे. त्यात खुल्या बाजारात तुरीचे दर ४,३०० ते ४,४०० रुपये आहे. मात्र असलेल्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना शासकीय दरापासून वंचित रहावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तूर खरेदी करताना असलेल्या जाचक अटी दूर कराव्या अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title:  Government relief to tur growers