लॉकडाऊन काळात गरजूंना शासकीय धान्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST2020-05-26T05:00:00+5:302020-05-26T05:00:22+5:30
स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे.

लॉकडाऊन काळात गरजूंना शासकीय धान्याचा आधार
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/ आर्वी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आता गरिबांसोबतच मध्यमवर्गीय कचाट्यात सापडला आहे. स्थानिक कामधंदे आणि मजुरीही बंद असल्याने शासकीय धान्याचा अनेकांना आधार मिळत आहे. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची परिस्थिती सावरली जात आहे. त्यात त्यांना एका किलोवर एक किलो चणाडाळ मोफत मिळत असून शासनाने साखरही उपलब्ध करून दिली आहे.
तालुक्यात ८ हजार ११० अंत्योदय शिधापत्रिकाधारक आहेत. तर २१ हजार २५९ प्राधान्य गट कार्डधारक, २ हजार ७८१ शेतकरी कार्डधारक तर एपीएलचे १ हजार ९८५ असे एकूण २४ हजार १३५ शिधापत्रिकाधारक कुटुंबे आहेत.
या शिधापत्रिकाधारकांना शहरातील २५, तर ग्रामीण भागातील ९८ अशा १२३ रेशन दुकानातून धान्याचे वितरण केले जाते. शासनाच्या अन्न नागरी व पुरवठा विभागातर्फे मे महिन्यात अंत्योदय गटासाठी ८१.१० किलो चणाडाळ ४५ रुपये किलोप्रमाणे वितरित करण्यात आली, तर त्यावर एक किलो मोफत चणाडाळ या गटाला देण्यात आली. मोफत वितरणासाठी पुन्हा ८१.१० किलो चणाडाळ देण्यात आली, तर १ हजार ४१३.६५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले.
मे आणि जून महिन्यासाठी अंत्योदयसाठी गहू २ हजार ४३२.४० किलो, तांदूळ ३ हजार २४३.२० किलो तर साखर १६२.५ किलोचा साठा अंत्योदयसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. प्राधान्य गटासाठी २०६.४० किलो चणाडाळ (४५ किलो भावाप्रमाणे) तर २१६.८५ किलो चणाडाळ आणि ४ हजार ३०८.८० किलो तांदूळ मोफत वितरणासाठी देण्यात आले होते. मे जून महिन्यासाठी ५ हजार १६२.०४ किलो गहू तर ३ हजार ४४१.३६ किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला होता.
शेतकरी गटासाठी ६६७.२४ किलो गहू, तर ४५८.१६ किलो तांदूळ मे जून महिन्याच्या वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. तर एपीएल गटासाठी २३०.८५ किलो गहू आणि १५३.९० किलो तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे वितरण सुरू आहे. शासन निर्णयानुसार धान्य वितरणामुळे सर्वसामान्यांसह गरजूंना मोठा आधार मिळाला आहे.
शेतकरी आणि एपीएल रेशन मोफत धान्य नाही
मे महिन्यात आतापावेतो अंत्योदय ७ हजार ३५१ कार्डधारकांना, प्राधान्य गट १९ हजार ५३४, तर शेतकरी गटातील २ हजार २५४ कार्डधारकांना धान्याचे वितरण करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात जून महिन्याचे वितरण सुरू होईल.
लॉकडाऊन काळात अन्नसुरक्षा योजना किंवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या विना शिधापत्रिकाधारक व्यक्तींना मे व जून या दोन महिन्यांकरिता प्रत्येक व्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यासाठी विस्थापितांची नावे घेण्यासाठी नगरपालिका आणि पंचायत समितीला निर्देश देण्यात आले असून त्यांची नावे आल्यावर त्या पद्धतीने धान्यसाठा विस्थापितांना मोफत वितरित केला जाणार आहे.
- अनिल पाटील, पुरवठा विभाग, तहसील कार्यालय, आर्वी.