शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्या
By Admin | Updated: December 13, 2014 02:06 IST2014-12-13T02:06:44+5:302014-12-13T02:06:44+5:30
यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने ...

शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत द्या
हिंगणघाट : यंदा खरीप हंगामात पावसाने हुलकावणी दिली़ यामुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे जावे लागले़ बी-बियाण्यांच्या खर्चाने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. या संकटाचा सामना करण्याकरिता शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे व शिष्टमंडळाने केली़ याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले़
नैसर्गिक संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. या स्थितीत सरकारने मदत करणे अत्यंत आवश्यक आहे़ पावसाच्या लपंडावामुळे सोयाबीन, कापुस, तूर आदी पिकांची पेरणी दीड महिना उशिराने करण्यात आली़ त्यामुळे उत्पन्न प्रभावित झाले. मध्यंतरीच्या कालावधीत पावसाच्या गैरहजेरीने कापुस, सोयाबीन, तुर पिके गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचे एकरी उत्पादन ५० किलोपासून मिळत आहे. अशी अल्प उतारी आल्यामुळे यंदाचा खर्च निघण्याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. काही शेतकऱ्यांना शेतात गुरे सोडून सोयाबीनचे पीक सवंगणाचे कामच राहीले नाही़ यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली़ खरीप हंगामात कापसाच्या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकले नाही़ त्यामुळे कपाशीची वाढ खुंटली आहे. जमिनीला भेगा गेल्या असून किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यंतरी धुक्यांमुळे कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे. तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव असल्याने उत्पनाची हमी नाहीच. पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फटका सहन करावा लागला. फळांची काही झाडे सुकली आहे़ अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे़ भारनियमनाने पाणी असताना ओलित होऊ शकत नाही़ पिकांना पाणी न मिळाल्याने पिके सुकत आहे. भारनियमन तातडीने बंद करण्यात यावे़, अशी मागणी करण्यात आली.
सरकारच्या धोरणाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपाचे वीज बील १०० टक्के माफ करण्यात यावे़ तसेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने एकरी २५ हजार रूपयाची मदत देऊन दिलासा द्यावा, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १ लाख रूपयाची मदत जाहीर करावी़, अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, शशांक घोडमारे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)