निम्न वर्धा प्रकल्प २६ वर्षांतही अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:57 IST2018-04-28T23:57:15+5:302018-04-28T23:57:15+5:30

धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. सध्या या प्रकल्पाला मूर्त रूप आले असले तरी तो अद्याप अर्धवटच आहे. या प्रकल्पातून सुमारे ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होईल, असा प्राथमिक अंदाज होता.

The following Wardha project is incomplete even in 26 years | निम्न वर्धा प्रकल्प २६ वर्षांतही अपूर्णच

निम्न वर्धा प्रकल्प २६ वर्षांतही अपूर्णच

ठळक मुद्देसिंचनाचे स्वप्न दूरच : ४८.०८ कोटींचा प्रकल्प पोहोचला २,३६५ कोटींवर

पुरूषोत्तम नागपुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : धनोडी (बहाद्दरपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्प निर्मितीला २६ वर्षांपूर्वी १९८१ मध्ये हिरवी झेंडी मिळाली. सध्या या प्रकल्पाला मूर्त रूप आले असले तरी तो अद्याप अर्धवटच आहे. या प्रकल्पातून सुमारे ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन होईल, असा प्राथमिक अंदाज होता. ३१ गेट असलेल्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी कोट्यवधींच्या निधीची गरज आहे. यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धनोडी (बहाद्दपूर) येथे १ जानेवारी १९८१ रोजी निम्न वर्धा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. ३६ हजार ३३५ हेक्टरची सिंचन क्षमता असलेला व ४८.०८ कोटी रुपयांच्या खर्चात तयार होणाऱ्या या प्रकल्पाची शेतकºयांना प्रतीक्षा होती; पण तो २०१८ पर्यंतही पूर्ण होऊ शकला नाही. निम्न वर्धा प्रकल्प शासकीय उदासिनता आणि अधिकाऱ्यांच्या लालफितशाहीत अडकला आहे. विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण न झाल्याने प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली. बांधकाम साहित्याच्या किमती वधारल्याने आजपर्यंत तीन वेळा वाढीव सुधारित दराने प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. सद्यस्थितीत प्रकल्पाची किंमत २,३६५.०८ कोटी रुपये झाली आहे. या निधीलाही शासनाने १८ आॅगस्ट २००९ रोजी मंजुरी दिली. निम्न वर्धा प्रकल्पामुळे वर्धा जिल्ह्यातील ४६ गावे व अमरावती जिल्ह्यातील १७ गावे बाधित झाली आहेत. या प्रकल्पामुळे सुमारे १६ हजार ५६६ व्यक्ती प्रभावित झाल्या. ६३ बाधित गावांपैकी २९ गावांचे पूनर्वसन करण्यात आले. ही कामे ९५ टक्केच पूर्ण झालीत. उर्वरित गावांना अद्याप मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. यामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांत असंतोष पसरला आहे.
निधी नसल्याने मुख्य कालव्याचे काम ठप्प
निम्न वर्धा प्रकल्पाच्या निर्मितीप्रसंगी ३६ हजार हेक्टर जमिनीचे सिंचन शक्य असल्याचे सांगण्यात आले होते; पण २६ वर्षांचा कालावधी लोटला असताना प्रकल्प पूर्ण झाला नाही. मुख्य कालव्याचे खोदकाम केले आहे; पण तो पूर्ण झाला नाही. काही ठिकाणी सिमेंटीकरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी केवळ खोदकाम करुन ठेवले आहे. या कालव्यात बुडून पुलगाव, नाचणगाव परिसरातील अनेक युवकांचा मृत्यू झाला; पण कालव्याचे काम पुढे सरकले नाही. आजही पुलगाव येथे कालवा खोदकाम केलेल्या स्थितीतच आहे. यासाठी निधी देण्याची ग्वाही दिली जात असली तरी कृती मात्र नाही.

Web Title: The following Wardha project is incomplete even in 26 years